रविवार, १७ जानेवारी, २०२१

इंद्राचा सामाजिक न्याय

छायाचित्र सौजन्य : https://www.alamy.com/

सामाजिक न्याय देण्यासाठी सत्ता असणे गरजेचे नाही. पक्ष किंवा संघटनेचे काम करतानाही आपण सामाजिक न्याय देऊ शकतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे.  आता हेच बघाना इंद्राने त्याची ह हा हि ही हु हू पार्टी  सत्तेत नसतानाही अनेकांना सामाजिक न्याय दिला आहे. किंबहुना इंद्राने स्वत:ला सामाजिक न्यायासाठीच वाहून घेतले आहे.  अनाथ मुले, विधवांना इंद्राने सामाजिक न्याय दिला.  त्यांना राजाश्रयही दिला. आपल्या एकमेव द्वितय अशा ह हा हि ही हु हू पार्टीत त्यांना मानाची पदे दिली. इंद्राचा सामाजिक न्याय एवढ्यावरच थांबत नाही. प्रेमभंग झालेल्या महिलांनाही इंद्र तेवढ्याच आपुलकीने वागवतो. याचे सर्वोत्तम उदाहरण कविता भाभी.

 ह हा हि ही हु हू पार्टीची राष्ट्रीय प्रवक्ती असलेल्या नारदीने दिलेल्या माहितीनुसार, कविता भाभीचे आपल्या नात्यातीलच एका रांगड्या तरुणाशी प्रेम जुळले होते. कविता भाभीचा पती अत्यंत सोज्वळ माणूस. पण कविता भाभीला  रांगडा तरुण आवडला म्हटल्यावर काय?  पतिदेव कामावर गेल्यानंतर कविता भाभीला अख्खे आटपाट नगर मोकळे होते. त्या रांगड्याची  कविता भाभीच्या घरी नेहमीची उठ-बैस सुरू असायची.   'जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे' असे वातावरण.  कविता भाभीला त्या तरुणाची संगत कायम हवी हवीशी वाटत होती. त्याच्या दुचाकीवर मागे बसून अनेक दिवस ती भटकत राहिली.  पण दुसऱ्याच्या बागेतील फळे किती दिवस चोरून खायची. आपलीही बाग असावी, या उद्देशाने त्या रांगड्या तरुणाने आपली स्वत:ची बाग उभारण्याची  म्हणजे लग्न करण्याचा विचार केला. त्याचा एका सुंदर तरुणीशी विवाह जुळला. पण ही गोष्ट कविता भाभीला खटकू लागली. कारण त्याने लग्न केले तर त्याची साथ सुटेल, अशी कविता भाभीला पक्की खात्री होती. त्यामुळे त्याने लग्नच करू नये, यासाठी कविता भाभीचा आटापिटा सुरू झाला. तिने त्याला लग्न करण्याच्या इच्छेपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्नही केला. त्याला फोन करून धायमोकलून रडलीही. कविता भाभीचा कोणताच फंडा कामी नाही आला.  पण त्या रांगड्याने लग्नाच्या बेडीत अडकायचेच अशी पक्की खूणगाठ बांधल्याने कविता भाभीच्या जाळ्यातले सावज जाळ्यातून निसटले.  शेवटी तो एका सुंदर बागेचा धनी झाला. त्याच्या लग्नाला कविता भाभी काळजावर दगड ठेवूनच उपस्थित राहिली होती. कविता भाभीच्या प्रेमभंगाची खबर नारदीने इंद्रापर्यंत कधीचीच पोहोचती केली होती. इंद्रच नव्हे तर तिने ही वार्ता गावभरही पसरवली. 

रांगड्या तरुणाची साथ सुटल्यानंतर कविता भाभी अस्वस्थ झाली. तिचा प्रेमभंग झाला. अशा वेळी इंद्र आणि नारदीलाच तिची दया आली. इंद्राने सामाजिक न्यायाच्या भूमिकेतूनच कविता भाभीला आपल्या ह हा हि ही पार्टीत सामील करून घेतले. इंद्राच्या पार्टीत पहिल्या दिवसापासून नारदी प्रवेशकर्ती झाली होती. तिने कविता भाभीचे मन हलके व्हावे, तिला रांगड्या तरुणाचा विरह जाणवू नये, यासाठी तिला आपल्या हे है हो हौ हं ह: क्लबचे सदस्यत्व दिले. क्लबचा गप्पांचा फड, कविसंमेलने, शेरो-'शायरी आणि हास्यजत्रेत कविता भाभीचे मन रमून गेले. तिला त्या रांगड्या तरुणाचा हळूहळू विसरही पडला. 

ह हा हि ही हु हू पार्टी आणि हे है हो हौ हं ह: क्लबच्या कार्यक्रमांना नियमित हजेरीमुळे कविता भाभी इंद्राच्या खास बैठकीतील पदाधिकारी बनली होती. घराला कोणता रंग द्यावा इथपासून ते सकाळच्या नाश्त्यात काय पदार्थ असावेत तिथपर्यंतचा सल्ला कविता भाभी इंद्राकडून घेऊ लागली. इंद्र नेहमीच सामाजिक न्यायाच्या भूमिकेत वावरणारा असल्याने तो ही दिलखुलासपणे कविता भाभीला सल्ले देत होता. कदाचित कविता भाभीला छोटे बाळ असते तर त्याचे डायपर कोणत्या ब्रँडचे असावे, साईज काय असायला हवी असे विचारायला कविता भाभी मागे हटली नसती. एरवी परपुरुष भुतासमान मानणारी कविता भाभी इंद्राशी एकट्यात बोलण्यासही संकोच करत नव्हती. गोडबोल्या इंद्रालाही कविता भाभीचा सहवास जणू आवडू लागला होता.

इंद्राच्या देशाची राजकीय गादी सांभाळण्याच्या इच्छेला कविता भाभी तन, मन आणि धनानेही साथ देत होती. तर नारदी तन आणि मनाने प्रचंड स्फूर्तीने कामाला लागली होती. घरची आणि दारची कामे झाली नाही तरी चालतील पण इंद्राचा प्रत्येक शब्द खाली पडला नाही पाहिजे याची ती प्रचंड दक्षता घेऊ लागली. पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते समर्पित भावनेतून पक्षाचे कार्य पुढे रेटत असल्याने इंद्र जाम खूश होता. तो त्यांना आपल्या धनाच्या जोरावर खूश ठेवू लागला. इंद्रासारखा दुसरा कोणीच नाही, असा प्रचार संपूर्ण आटपाट नगरीत सुरू  झाला. त्यामुळे इंद्र तर आणखीच हुरळून गेला होता. पक्ष कार्यालयात नियमित बैठकांचे सत्र सुरू होते. सामाजिक न्याय मंत्री ज्या प्रमाणे जनता दरबार भरवतात अगदी तसाच दरबार इंद्रही भरवू लागला. महिला पदाधिकाऱ्यांसोबतच त्यांच्या पतिराजांचाही इंद्राला जोरदार पाठिंबा मिळू लागला. नारदीकडे तर पक्षाचे मोठेच पद होते. त्यामुळे ती स्वत:ला आटपाट नगराची नगराध्यक्ष असल्याच्या तोऱ्यात वावरू लागली.  नारदी आणि कविता भाभीने तर इंद्रावर जीवच ओवाळून टाकला होता. सामाजिक न्यायात उणिवा राहू नयेत, याची इंद्रही मोठी काळजी घेत होता. त्याने   आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना कधीच कशाची झळ पोहोचू दिली नाही. नारदी आणि कविता भाभीची बाजू खरी असो वा खोटी, इंद्र त्यांच्या प्रत्येकच गोष्टींसाठी त्यांच्या मागे उभा ठाकला होता.

नारदीला अख्ख्या आटपाट नगरातील खबरी असायच्या. थोडक्यात नारदीला अ ला काना आ असे भलेही वाचता येत नसले तरी तिची कल्पनाशक्ती प्रचंड होती. रस्त्याने एखादा तरुण आणि तरुणी सोबत जात असतील आणि ते नात्याने भाऊ-बहीण असले तरी ते प्रेमियुगुलच असावे, इतकी प्रचंड तिच्या कल्पना शक्तीची भरारी होती. आनंदीबाईनी राजकारणात ध चा मा केल्याचे इतिहास सांगतो. पण नारदीने अख्खी बाराखडीच बदलून टाकली. कुठले उकार कुठे आणि इकडची वेलांटी तिकडे देऊन इतिहासाचा भूगोल करून टाकला. कविता भाभीच्या प्रेमभंगाचे प्रकरण नारदीने अख्ख्या आटपाट नगरात व्हायरल करून टाकले. फक्त बॅनर, होर्डिंग लागणेच बाकी राहिले होते. पण बिच्चाऱ्या कविता भाभीला नारदीच्या या अफाट कर्तृत्वाची काडीमात्रही कल्पना नाही. नारदीचे हे कर्तृत्व इंद्राला ठाऊक होते. पण आपली पार्टी फुटेल, देशाची राजगादी सांभाळण्याचे स्वप्न धुळीला मिळेल म्हणून तो नारदीला मोठ्या अंत:करणाने सहन करत होता. 'प्यार और जंग मे सब जायज हे' या उक्तीनुसार आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून इंद्र सर्व गोष्टी 'नजरअंदाज' करत होता.. करत राहणार... कारण सामाजिक न्याय!


शनिवार, ९ जानेवारी, २०२१

ह हा हि ही पार्टी

छायाचित्र सौजन्य : http://brandhights.com/

पृथ्वीतलावर आलेल्या इंद्राचा देशाच्या राजकारणातील रस खूपच वाढला होता. त्याला देशातील 'आदरणीय' लोकांसारखे राजकारण जमत नसले तरी तो राहत असलेल्या आटपाट नगरातच राजकारणाचे फंडे अजमावू लागला. कदाचित स्थानिक राजकारणातून इंद्राला देशाची राजगादी सांभाळण्याची इच्छा असावी. या राजकारणासाठी त्याने आपला भक्त वर्गही तयार केला आणि 'ह हा हि ही हु हू' पार्टी स्थापन केली.  तसेही गोड बोलून आपला कार्यभाग साधण्याची किमया इंद्राला चांगली अवगत होतीच. या कामी त्याला नारदीची (स्त्री रुपातील काडीखोर  व्यक्तिमत्त्व) तेवढीच भक्कम साथ मिळाली होती. आटपाट नगरीतील सर्व घटना व घडामोडी, बातम्या नारदी इंद्राला तेल-मीठ आणि मालमसाला लावून सांगण्याचे काम  करत होती. त्यामुळे इंद्रही कधी नारदीला नाराज करत नव्हता. तिच्या चांगल्या वाईट कृत्यांना त्याचे पूर्ण समर्थन होते. किंबहुना तशी तिला फूसही लावत असे.  'ह हा हि ही हु हू' पार्टीचा अध्यक्ष असलेल्या इंद्राने नारदीला आपल्या पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्तेपद बहाल केले. इंद्राची पार्टी स्थानिक असली तरी नारदी मात्र राष्ट्रीय स्तरावरील हालचालींवर नजर ठेवून असे. आटपाट नगर म्हणजे आपलीच मालमत्ता, अशा आविर्भावात ती वावरत असे. नारदीने ह हा हि ही हु हू पार्टीच्या समर्थनासाठी 'हे है हो हौ हं ह:' क्लबची स्थापना केली. क्लबची मंडळी वेळ मिळेल तेव्हा गप्पा पार्टी करू लागली.  त्यांची कविसंमेलनेही नियमित भरू लागली. कधी कधी कथाकथनही व्हायचे. आटपाट नगरातील कथांवर निरुपणे होऊ लागली. कोण कुठे जातो, कुणाच्या घरी कोण येतो, कुणाच्या घरातून काय आवाज निघतात, कोणी कसे कपडे घातले, कोण कसे दिसत होते, कुणी कुणास काय म्हटले अशा सर्वच गोष्टींवर 'हे है हो हो हं ह:' क्लबमध्ये चर्चांचे फड रंगू लागले. मात्र प्रत्येक कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी नारदीच असणार हे गणित ठरलेले. कारण क्लबच्या कार्यक्रमासाठी आवश्यक मानसिक पाठबळ म्हणा किंवा किरकोळ निधी इंद्राकडून मिळवण्याची जबाबदारी नारदीच घ्यायची. अगदी क्लबच्या कोणत्याही सदस्याचा वाढदिवस असो वा त्यांच्या लेकरांचा, इंद्र प्रत्येक ठिकाणी पुळका दाखवत असल्याने इंद्र त्यांच्यासाठी पूजनीय झाला होता. दुसरी गोष्ट म्हणजे नारदीचे आटपाट नगरात गणगोतही मोठेच. त्यामुळे आपण तिची राष्ट्रीय प्रवक्तेपदि केलेली निवड किती योग्य आहे, यावर इंद्राला गर्व वाटत होता. नुसता गर्वच नाही तर त्याची छाती गर्वाने ५६ इंचापेक्षाही जास्त म्हणजे ६१-६२ इंचापर्यंत फुगत होती.

नारदीच्या क्लबचे सदस्यत्व आटपाट नगरातील कविता भाभी, सुनीता ताई, रंजना ताई, स्नेहल ताई अशा काही पुढारी गुण असलेल्या महिलांनी स्वीकारले होते.  एवढेच काय तर  इंद्राने त्यांना आपल्या पार्टीतही सहभागी करून घेत त्यांना पदे बहाल केली. कविता भ्राभीला कार्याध्यक्षपद दिले. सुनीता मावशी सरचिटणीस, स्नेहल ताई कार्याध्यक्ष झाली. रंजना ताईच्या मागे अधिक कौटुंबिक व्याप आणि नोकरीचा ताण असल्याने तिला खजीनदार म्हणून नियुक्ती दिली गेली. यातील काही पदाधिकारी महिला इंद्राच्या 'जिवा'भावाच्या बनल्या. यात कविता भाभीचे स्थान अव्वल. कविता भाभी तशी पुरुषद्वेष्टी पण याला एकमेव इंद्र अपवाद होता. 'इंद्रदेवा तुमच्यासाठी काय पण', इथपर्यंत कविता भाभीची तयारी. त्यामुळे कविता  भाभी आपला पक्ष कधीच सोडणार या विश्वासातून इंद्राने तिला कार्याध्यक्षपद बहाल केले होते.  तसाही  कविता भाभीचा स्वभाव  गूढ होता. तिच्या ओठांत काय आणि पोटात काय, हे इंद्रालाही कळू नये, असे तिचे व्यक्तिमत्त्व. त्यामुळे असा गुण असलेल्या व्यक्तींना इंद्राने आपल्या पार्टीत प्राधान्याने स्थान दिले होते.

  राजकारणातील यशासाठी  इंद्र आपला खजिना मुक्त हस्ते उधळू लागला. पण अपेक्षित यश काही त्याच्या पदरी पडत नव्हते.  त्यामुळे इंद्र आतून प्रचंड खवळलेला होता. इतर पक्षातील मातब्बरांना जेरीस आणले तर... अशी आयडिया त्याच्या डोक्यात आली.  राजकारणातील यशासाठी नारदीच आपल्याला तन आणि मनाने मदत करू शकते, याचा त्याला पूर्ण विश्वास होता. तसेही नारदीकडे तन आणि मन या दोनच गोष्टी होत्या. धनाचा आणि तिचा कधी फारसा संबंध नव्हता. नारदीच्या मदतीने इंद्राने प्रतिस्पर्धींना नामोहरम करण्यासाठी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली. 

आटपाट नगरात आपल्याचा नावाचा डंका वाजला पाहिजे यासाठी  इंद्राने विरोधकांना सळो की पळो करून सोडण्याचा डाव रचला. साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. यासाठी आपली अतिविश्वासू नारदीसोबत चर्चा करून सर्वात आधी विरोधकांना बदनाम करण्याचा डाव रचला. सर्वात आधी आपल्या राजकीय प्रवासात आड येणाऱ्यांना आडवे करण्याचा इंद्र आणि पार्टीने चंग बांधला. विरोधकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तर तो विरोध करणे थांबवेल आणि राजकारणातील अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचता येईल, असे इंद्राला वाटू लागले. नारदीच्या मदतीने इंद्राने विरोधकांच्या खासगी आयुष्यातील काही घटनांची माहिती मिळवत त्यांचा अपप्रचार करण्याचे नारळ फोडले. विरोधातील कोण्या व्यक्तीने सहजपणे एखाद्या माता-भगिनीकडे पाहिले तरी इंद्र आणि पार्टी विरोधक व्यक्ती महिलांकडे वाईट नजरेने पाहतो, असा प्रचार करू लागली. विरोधक कुणाशी बोलला तर या प्रचाराला आणखीच वेग येई. भारदस्त आवाजाची धनी असलेल्या नारदीला लाऊड स्पीकरचीही गरज नव्हती. ती सहज बोलली तरी आठ-दहा घरांपर्यंत आवाज पोहोचावा अशी तिची वाणी होती. इंद्र आणि पार्टीच्या या प्रचाराचा विरोधकांना त्रास होणे सुरू झाले. एका भगिनीच्या पतिदेवांनी या पार्टीच्या अपप्रचाराला बळी पडून एका विरोधकाशी भांडणही उकरले. या भांडणात शिष्टाई म्हणून इंद्राने 'मोठेपणा' दाखवत समेट घडवून दिला. पण मात्र एक विरोधक अत्यंत व्यथित झाला. पण  इंद्राचा आनंद पृथ्वीतलासह स्वर्गलोकातही मावत नव्हता.  इंद्र आणि नारदी आपला अपप्रचार करताहेत, हे सुरुवातीला विरोधी पक्षनेत्याच्या लक्षात नव्हते आले. पण नंतर या कारस्थानात 'अपाक' शक्तीचाच हात असल्याची त्याला खात्री पटली आणि इंद्राने रचलेला चक्रव्युह एकदाचा भेदून काढायचा अशी तयारी त्याने केली.  

राजकारणात शह-काटशह कसा द्यायचा असतो हे विरोधी नेत्याला ठाऊक होते. पण घाणेरडे राजकारण करायचे नाही, हा त्याचा नियम होता. मग त्यानेही आपल्या पद्धतीने इंद्र आणि पार्टीची बारीक-सारीक माहिती घेण्यास सुरुवात केली आणि त्याच्या हाती इंद्र आणि त्याच्या भक्तांचा  कच्चाचिठ्ठाच लागला. नारदी आपली अत्यंत विश्वासू आहे, असा इंद्राचा (गैर) समज होता. पण केवळ तन आणि मन असलेली नारदी स्वत:च्या फायद्यासाठी विरोधकांनाही आपल्या पार्टीतील काही 'राज'कीय गोष्टी सांगते, याची इंद्राला अजिबात कल्पना नव्हती.  इंद्राच्या आयुष्यातील काही चमत्कारी घटनांचा भांडाभोड या नारदीनेच केला. नारदी आपल्या स्वार्थासाठी कधीकधी पार्टी बदलते हे इंद्राला माहीत नाही. नारदी अनेकदा इंद्राविषयी विरोधकांकडे बोलतच होती. त्यावरून लोकांना नैतिकतेचे धडे देणारा इंद्र किती पाण्यात आहे, याची पूर्ण कल्पना विरोधकांना आली. शिवाय इंद्राशी भेट होण्यापूर्वी नारदीनेही काय काय दिवे लावले याचीही माहिती विरोधकाला मिळाली होतीच.  

नारदीने इंद्राचा असा केला भंडाफोड 

इंद्रपुरीत इंद्रानेच विवाह पद्धती लागू केली.  सूत्रांच्या माहितीनुसार एकापेक्षा जास्त बायका करण्याचीही त्याने परवानगी दिली. तसा इंद्रानेही विवाह केलेला होताच. पण इंद्रच म्हटल्यावर तो कितीही बायका करू शकतो हे ओघानेच आले.  सर्वसामान्य माणूस एकाच बायकोत हैरान, परेशान होतो, तिथे दुसरी म्हटल्यावर काय होणार? पण इंद्राला कशाची झळ बसणार. त्याच्याकडे मोठा खजिना होताच. नारदीच्या कथनानुसार  इंद्र आटपाट नगरात प्रकट होण्यापूर्वी  एकदा पृथ्वीतलावरील एका जिल्ह्यात प्रकटला होता. तिथे त्याचा एका महिलेवर जीव जडला. तसे पाहिले तर ही महिला इंद्रपुरीतील अप्सरा, मेनका, रंभा, उर्वशी यांच्याप्रमाणे सुंदर नव्हती. पण जीवच जडला म्हटल्यावर काय? त्याने महिलेसमोर प्रस्ताव मांडला आणि ती महिलाही इंद्राच्या एका शब्दात त्याची झाली. इंद्र त्या महिलेच्या प्रेमांत आकंठ बुडाला. आपल्या पार्टीच्या लोकांना तो तिची 'अर्धांगिनी' अशी ओळख करून देऊ लागला. इंद्रदेवाची अर्धांगिनी म्हटल्यावर या वहिनींभोवतीही ह हा हि ही हु हू पार्टीचे पदाधिकारी आणि सदस्य गोंडा घोळू लागले.  पण वास्तव तर याही पेक्षा वेगळेच निघाले. त्या महिलेच्या प्रेमात बुडालेल्या इंद्राकडे आपसुकच त्या महिलेच्या दोन लेकरांचे 'बाप'पण आले. विनाकष्ट तो बाप बनला होता.  अनिच्छेने का होईना इंद्राला या दुसऱ्या खटल्यापाई बाप म्हणून कन्यादानही करावे लागले.  इंद्राच्या पहिल्या पत्नीला त्याच्या दुसऱ्या प्रपंचाविषयी माहिती मिळाल्याने तिचा तिळपापड झाला तो वेगळाच. तिच्या विरोधामुळेच इंद्राला इंद्रनगरी सोडून आटपाट नगरात ठाण मांडावे लागले, इत्यादी गोष्टी नारदीच्या मुखातून विरोधकांपर्यंत पोहोचल्या. मात्र,  याची पुसटशी कल्पनाही  इंद्राला नव्हती.  तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून राजकारणाचे डावपेच आखू लागला. नारदीवरील विश्वास तसूभरही कमी झाला नव्हता. उलट त्याने नारदीला आटपाट नगरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही विरोधकांचे बदनामी सत्र सुरू करण्यास अनुमती दिली.  पण घाणेरडे राजकारण करायचे नाही, हा विरोधकांचा बाणा असल्याने सध्या तरी ते शांत आहेत. ते शांतपणेच या चोरांच्या उलट्या बोंबा ऐकून घेत आहेत. पण राजकारणातही बुद्धिबळाप्रमाणे शह आणि काटशह देता येतो, याची कदाचित इंद्राला जाणीव नसावी!  

(पुढील भाग सवडीनुसार देऊ )

(अस्वीकरण :  या राजकीय कथेतील पात्र, घटना, स्थळ, प्रसंग पूर्णत: काल्पनिक आहेत. याचा कोणतीही व्यक्ती, देवदेवता, पक्ष, संघटना, धर्म वा पंथाशी संबंध नाही. तरीही कुणाला या कथेशी साम्य वाटत असेल तर हा निव्वळ योगायोग समजावा )

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...