शुक्रवार, २३ मार्च, २०१८

स्वप्नांचा जन्म


माझी आई विठाबाई नरबा पाईकराव हिच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करून सोशल मीडियावरील माझ्या पहिल्या ऑनलाइन लिखाणाला आज २३ मार्च, २०१८ रोजी सुरुवात करीत आहे. 

तसे पाहिले तर सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअॅपपासून ते फेसबुक, ट्वीटरपर्यंत अनेक मीडिया आहेत. परंतु ब्लॉग स्वरूपातील लिखाणालाच मी प्रथम प्राधान्य देऊ इच्छितो. त्याचे कारण म्हणजे हे लिखाण मला संग्रही ठेवता येणार आहे.
गेल्या २४ वर्षांपासून मी वृत्तपत्र क्षेत्रात काम करीत आहे. प्रशिक्षणार्थी वार्ताहर, प्रशिक्षणार्थी उपसंपादक,  उपसंपादक, रिपोर्टर, चीफ रिपोर्टर असा प्रवास करीत आता मुख्य उपसंपादक या पदापर्यंत कसाबसा पोहोचलो. हा कसाबसा शब्दच मी मुळात जाणीवपूर्वक वापरत आहे. कारण मुख्य उपसंपादक पदापर्यंत पोहोचण्यासाठी मला काय काय आणि किती संघर्ष करावा लागला, हे मलाच ठाऊक. पण हा संघर्ष मी रडतपडत केला नाही. या काळात माझ्यावर अनेक संकटेही आलीत. पण त्याचा सामना मी तेवढ्याच सामर्थ्याने केला, हे मला प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते.  आजवरचे आनंदी आयुष्य मी  आत्मविश्वासाच्या जोरावरच जगू शकलो, याचा मला आनंद वाटतो.  आज आयुष्याच्या सामन्यातील हाफ सेंच्युरीसाठी  तीन धावांची गरज आहे. अर्थात निम्म्याहून अधिक गवऱ्या मसनात गेल्या, हे तर उघड आहे. मी विविध दैनिकांत काम केले. समाजात पत्रकार म्हणून मिरवलो.  मानमरतबही मिळाला.  या क्षेत्रातील मोठा अनुभवही पाठीशी आहे. पत्रकारितेचे जीवन आणि माझे खासगी जीवन जगताना मी माझ्याच टर्म्स आणि कंडिशन्सवर जगत आलो आहे. ज्या संस्थेच्या नोकरीत मला अधिक रुची वाटली नाही ती नोकरी मी सोडत गेलो. असे करत मी आजवर पाच-सहा दैनिकांच्या नोकऱ्या सोडल्या. गेल्या सहा वर्षांपासून भास्कर समुहाच्या 'दिव्य मराठी' या वृत्तपत्रात मी काम करीत आहे. येथे अजून किती दिवस, किती वर्षे राहणार, हे माहीत नाही. 
एकूणच या क्षेत्रात काम करताना मी शेकडो माणसे जोडली. अजूनही जोडतच आहे. यातील फार तर दोन किंवा तीनच व्यक्ती माझ्यापासून दुरावल्या. त्यांची नावे सांगणे येथे मला जमणार नाही. म्हणजे सांगणे उचित ठरणार नाही. माणसं जोडणे हा माझा छंद आणि त्याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास हा माझा धंदाच आहे. इतरांप्रमाणे मला हजारो किंवा लाखो माणसं जोडताही आली नसली तरी ज्यांच्याशी माझी नाळ जुळली, ज्यांचे विचार मला पटले, माझे विचार ज्यांना पटले अशा व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये येणार म्हणजे येणार. 
असो.. पत्रकारितेच्या आयुष्यावर लिहिण्यासारखे खूप सारे आहे. पण या ब्लॉगची निर्मिती करण्यामागचे माझे वेगळेच स्वप्न आहे. होय स्वप्नच. या स्वप्नांनीच आज मला लिहिते केले आहे. मला कथा, कादंबऱ्या, सिनेमा या गोष्टींची आवड आहेच. पण लिहायलाही आवडत होते. पण बातम्या लिहिण्यापलिकडे मी लिखाणाला वेळ देऊ शकलो नाही, ही आजवरची माझी सर्वात मोठी खंत. मी काही तरी लिहावे, हेच माझे स्वप्न होते. काय लिहावे, याचे उत्तरही मला माझ्या स्वप्नांनीच दिले. होय स्वप्नांनीच. प्रत्येक व्यक्तीला स्वप्ने पडतातच. काही स्वप्ने आनंददायी तर काही भयावह असतात. मी आनंददायी गटात मोडणारा असल्याने भयावह स्वप्नांना थारा देणार नाही, हे स्पष्टपणे सांगतो. मग ही आनंददायी स्वप्नेच मी आपल्याशी यापुढे शेअर करणार आहे. ही स्वप्ने झोपेत बघितलेली असोत  किंवा उघड्या डोळ्यांनी.. शेवटी स्वप्नं ही स्वप्नंच असतात. काही प्रत्यक्षात उतरतात आणि काही शेवटपर्यंत स्वप्नंच राहतात. आज माझ्या स्वप्नांनी जन्म घेतला, एवढेच सांगून थांबतो आणि पुढील पोस्टपासून माझे एक एक स्वप्न जन्माला येईल... धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...