रविवार, २५ मार्च, २०१८

हळूवार स्पर्श




कोणत्या तरी गावची जत्रा होती.हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपासचेच असावे.  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अर्थात एसटीने या यात्रेसाठी जादा बस सोडल्या होत्या. मी ही या बसने प्रवासाला निघालो. ख्यातीनुसार बस खडखट वाजत निघाली. काही अंतरापर्यंत चकचकीत रस्ता होता. जसे बसने वळण घेतले तसा खडाखडाट वाढला. रस्ता अत्यंड खड्डेमय होता. रस्त्यात खड्डे होते की खड्ड्यात रस्ता होता, हेच प्रवाशांना कळेना. बस ताशी २० कि. मी. वेगाने धूळ उडवत निघाली होती. रस्याच्या आजूबाजूला हिरवीगार शेती होती. एका बाजूला नदी वजा मोठा नालाही वाहत होता. त्यामुळे सभोवताली हिरवेगार वातावरण होते. बसमध्ये खच्चून प्रवासी बसलेले होते. तीन-चार प्रवासी तर चालकाच्या केबिनमध्ये ठाण मांडून होते. चालक अधूनमधून शेजारच्या सिटकडे एकसारखा बघत होता. मी आपला धक्के खात दरवाजाजवळील दुसऱ्या वा तिसऱ्या पायरीवर श्वास रोखून उभा होतो. गर्दीमुळे प्रवाशांच्या अंगाला घाम फुटला होता. त्याचा असह्य दरवळी सुटल्याने मी एका हाताने बसच्या टपाला लावलेला स्टिलचा बार तर दुसऱ्या हाताने नाकाला रुमाल लावून उभा होतो. मला उभ्या उभ्या चालक सारखा बाजूच्या सिटकडे का बघत आहे, याचा अंदाज येत नव्हता. कारण माझ्या शेजारी धिप्पाड आणि उंच शरीरयष्टीचा प्रवासी उभा होता. त्यामुळे चालकाच्या शेजारील सिटवर नेमके कोण होते, हे दिसत नव्हते. अचानक बस एका मोठ्या खड्ड्यात आदळली तसा धिप्पाड माणूस बाजूला सरकला. तसे मला चालकाच्या बाजूच्या सिटवरील व्यक्तीचे दर्शन घडले. त्या सिटवर साधारणत: पस्तीशीतील एक महिला बसलेली होती. गव्हाळ वर्णाची ती महिला होती. सरळ नाक, लांबट चेहरा आणि मोठ्या कपाळावर मोठी बिंदी असे काही क्षणापुरतचे तिचे घडलेले दर्शन मलाही तिच्या मोहात पाडणारे ठरले. त्यामुळेच की काय बसचालक सारखा बस चालवताना तिच्याकडे कटाक्ष टाकत होता.
बस हळूहळू गावाच्या दिशेने पुढे सरकत होती. रस्त्याच्या बाजूने जत्रेला जाणारी आणि परतणारी मंडळीही खिडकीतून नजरेस पडत होती. पण मला या माणसांकडे पाहण्याची अधिक रुची नव्हतीच मुळी.. मलाही रस्त्यावर कधी खड्डा येतो आणि ती धिप्पाड व्यक्ती बाजूला सरकून त्या पस्तीशीतल्या महिलेचे दर्शन कधी घडते, याची प्रतीक्षा लागून होती. त्या खड्डेमय रस्त्याने अशी तीन-चार वेळ संधी दिलीही. पण मन भरत नव्हते.  या जत्रेच्या मार्गावर एक छोटेसे गाव लागले. वाहकाने दोरी ओढून एकदाची घंटी वाजवली. तशी ती धिप्पाड व्यक्ती दोघा-तिघांना धक्के मारत एकदाची दारातून बाहेर पडली. त्याच्याबरोबर आणखी एक माणूसही खाली उतरला. वाहकाने खाडकन दरवाजा ओढला नि टन टन असा घंटीचा आवाज काढताच बस पुढे मार्गस्थ झाली. तो जाड्या उतरल्याचा मला किती आनंद झाला होता. एक तर बसमधील गर्दी थोडी का होईना कमी झाली होती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मला चालकाच्या केबिनमध्ये बसलेल्या त्या सुंदरीकडे थेट बघता येत होते. पण ती थोडी पाठमोरी असल्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा न्याहाळता येत नव्हता. तरी मी जितकी मान तिरपी करून तिचा चेहरा पाहता येत होता तेवढा पाहत होतो. शेजारीच उभा एक प्रवासी मात्र माझ्या मनातील खलबते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. एक वेळ मान वाकडी करताना माझ्या डोक्याने त्याच्या नाकाचा वेध घेतला होता. त्यामुळे तो थोडा रागातच होता. मी एक कटाक्ष त्यावर टाकला तेव्हा मात्र मला चपापल्यासारखे झाले. काही वेळ तरी मी माझी मान ताठ ठेवली. शेजारच्या त्या प्रवाशासह इतर कोणी माझ्याकडे बघतेय का, याचा मी अंदाज घेत होतो. पण तो सोडला तर इतर कोणीही माझे निरीक्षण करत नव्हते, याची मला खात्री पटली. त्याचा काही गैरसमज होऊ नये म्हणून मी उगीचच त्याच्याशी बोलण्याची चेष्टा केली. 'काय साहेब कुठं जायचंय' असा पहिला प्रश्न मी त्याच्यावर फेकला. तो काही तरी चांगले उत्तर देईल अशी माझी भाबडी आशा होती. पण पठ्ठ्याने 'तुम्हाला काय करायचे? असा प्रतिप्रश्न करताच मी पुरता गारद झालो. याच्याशी बोलून काहीच फायदा नाही, हे माझ्या सुज्ञ मनाला तात्काळ पटले. आता याच्याशी बोलून काही हशील होणार नाही, याची पूर्ण कल्पना आल्याने मी उगीच खिडकीबाहेर डोकावू लागलो. पण लोकांच्या गर्दीमुळे बाहेरचेही फारसे बघता येत नव्हते. त्या सुंदरीकडे बघावे तर शेजारचा तो बाबा माझ्याकडे मी जणू त्याचा सात जन्माचा वैरी असल्याच्या भावनेने बघत होता. त्यामुळे मरू दे, काय पडलंय त्या बयेत, अशी मनाची समजूत काढून मी तिच्याकडे आता बघायचेच नाही, असे मनोमन ठरवले. बस गचके खात एकदाची जत्रेच्या ठिकाणी पोहोचली. मी दाराजवळच उभा असल्याने दोन जणांच्या मागून बाहेर पडलो. जवळपास तासभर उभे राहून पाय गळून आले होते. त्यामुळे थोडे बाजूलाच जाऊन मी उभा राहिलो. माझ्या शेजारी उभा तो माणूसही बाहेर पडला. कैदेतून बाहेर पडावे, तसे प्रवासी आपापले सामान, थैले, बॅगा हाती घेऊन बसमधून बाहेर पडत होते. शेजारचा तो माणूसही माझ्याच शेजारी उभे राहून बसच्या दरवाजाकडे टक लावून होता. मी आपली नजर इकडे तिकडे भिरभिरत तिरप्या नजरेने बसच्या दाराकडे पाहत होतो. ती कधी उतरते याची मला उत्कंठा होती. तशी ती एकदाची उतरली. ती खाली उतरताच माझ्या शेजारी उभा माणूस 'ए चल.. किती वेळ लाला उतरायला.' असे म्हणत तिच्या हातातली थैली घेण्यासाठी पुढे सरसावला. आता मात्र सर्व चित्र स्पष्ट होते. तो तिचा नवराच होता, यावर शिक्कामोर्तब झाले. आता मात्र तेथे थांबण्यात मजा नव्हती. अजून तिच्यावर एक नजर जरी टाकली असती तर मी संकटात येणार होतो, याची मला जाणीव झाली. मी तरातरा ज्या देवस्थानाची जत्रा होती, तो रस्ता पावलांनी मोजू लागलो.
जत्रेला जाणारी माणसं झपाझप पावले टाकत होती. तरी परतणारी माणसं दमल्यासारखी एक एक पाऊल टाकत निघाली होती. काही टारगट मुले जत्रेतून विकत घेतलेल्या पुंग्यांतून कर्कश आवाज काढत निघाले होते. एकाने तर माझ्या कानाजवळच भों भो असा आवाज काढला. त्याच क्षणी त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली. पण ती टारगट मुले टोळक्याने होती. त्यामुळे त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची हिंमत मी जुटवू शकलो नाही. अशा प्रसंगी तलवार म्यान केलेली बरी, हे थोरांचे विचार मी जपले.
खरे तर ही जत्रा सप्टेंबरमधील असावी. पावसाळा पुरता संपलेला नव्हता. आभाळात ढगांची गर्दी होती. त्यामुळे वातावरण दमट होते. काही वेळातच पाऊस येईल, याचा मला अंदाज आला. पण जत्रेचं ठिकाण आणखी अर्धा किलोमीटर दूरवर होते.  पन्नास मीटर चालत गेलो तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. आता भिजण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कुठे आडोसा घ्यावा म्हटलं तरी बायाबापड्यांनी आधीच त्या जागा रिझर्व्ह केल्या होत्या. विचार करेपर्यंत पावसाचा जोर वाढला. खरेच आपण छत्री आणली असती तर.. असा विचार मनात डोकावत असतानाच डोक्यावर आपोआप छत्री आली. मी थोडा दचकलोच. पाहतो काय तर बसमधील तीच ललना माझ्या शेजारी डोक्यावर छत्री धरून सोबत चालत होती. एकाच छत्रीतून चालताना तिचा माझ्या खांद्याला खांदा लागताना माझे अंग अंग शहारून येत होते. वाऱ्यामुळे तिचे भिरभिरणारे केस माझ्या गालावर मोरपंखासारखे स्पर्शून जात होते. तिचे रूप अंबा आणि अप्सरेलाही लाजवणारे वाटत होते. तिच्याशी काय आणि कसे बोलावे, हेच मला सुचत नव्हते. फक्त मी तिच्याबरोबर चालत होतो. एखाद दोन पावसाचा थेंब अधूनमधून माझ्यावर अंगावर पडत होता. हवेत गारवा सुटला होता. मातीचा गंध सगळीकडे पसरला होता. आजूबाजूला कोण आहे, कोण येतेय, कोण जातेय याचे काहीच भान नव्हते. बस्स मी तिच्यासोबत चालत होतो आणि चालत होतो. माझ्यावर पावसाचा एक थेंबही पडू नये, याची ती काळजी घेत होती. पण कोण होती ती...
अचानक माझे पाय थकबले. मी चटकन मागे वळून बघितले. बसमधला तो माणूस मागे तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी मी मागे बघितले होते. पण तो कोठेही नव्हता. तेव्हा कुठे माझ्या जिवात जीव आला. पण माझ्यासोबत आहे ती होती तरी कोण. तिचे नि माझे नाते तरी काय? हा प्रश्न मात्र डोक्यात वारंवार घोळत होता.  ती कोणीही का असेना, पण तिचा सहवास मला सुखावत होता. तिचे व माझे जन्मो जन्मीचे नाते आहे, असाच भास मला होऊ लागला. पण तिची तर ओळख आत्ताच झाली होती. मग तिचे नि माझे नाते तरी काय, या चक्रव्युहात मी पुन्हा सापडलो.
पाऊस थांबला होता. डोक्यावरची छत्रीही तिने कधीच मोडून ठेवली होती. तिचा हात माझ्या हातात होता. म्हणजे तिनेच माझा हात घट्ट अावळून धरला होता. आम्ही ज्या रस्त्याने निघालो तेथे जत्राबित्रा काहीच नव्हती. निसर्गाने नटलेला तो सुंदर रस्ता होता. आम्ही जणू काश्मिरातल्या रस्त्यावरून भ्रमंती करत होतो. काही मिनिटांतच आम्ही हसू खिदळू लागलो. ती मला अरे कारे आणि मी तिला अगं तुगं बोलत होतो. मागचे सर्व भास अभास आता निखळून गेले होते. मी तिच्यासाठी ती माझ्यासाठीच या धरतीवर आल्याचे जाणवत होते. पण मध्येच पण कोण ही? हा प्रश्न पाठ सोडत नव्हता.  पण ती कोणी का असेना सध्या तरी माझीच, असे मनाला समजावून तिच्याशी एकरूप होत गेलो. हळूहळू माझ्यात कामदेवाने प्रवेश करणे सुरू केले. त्या क्षणी तरी ती माझ्यासाठी रतीच होती. आता मात्र कुठे तरी एकांतात जावे, कुठला तरी अडोसा गाठावा, अशी इच्छा झाली. मी म्हणालो 'हे बघ आपण त्या दाट झाडीत जायचं का?' तिचे उत्तर होते, 'नाही गडे मला प्राण्यांची भीती वाटते!' त्यावर माझा उपाय तयार होता. 'मग आपण असं करू, ते डोंगराच्या कडेला मंदिर आहे ना तिथं जाऊयात' या उपायावर तिने लगेच होकार दिला. आमची पाऊले डोंगराच्या दिशेने झपाझप पडत होती. आज माझी तहान भागणार या एका विचारानेच मला स्वर्गीय आनंद मिळत होता. त्याच विचाराने माझी पावले पुढे पडत होती. मी चालतच होतो, चालत होतो. पण डोंगर काही जवळ येत नव्हता. ती माझ्यासोबत चालून पुरेशी दमली होती. न राहवल्याने तिने 'कधी येणार रे ते मंदिर' असा भाबडा प्रश्न केला. 'हे काय समोरच आहे', असे दिलासा देणारे उत्तर मी तिला दिले आणि डोंगराच्या दिशेने नजर टाकली. पाहतो तर काय, डोंगर आणखी किती तरी दूर दिसला. मी दचकून आजूबाजूला बघितले तर आम्ही एका गजबजलेल्या वस्तीत आलो होतो. पण या गजबलेल्या वस्तीत कामदेवाला रती मिळणार कशी होती? तो डोंगर अजूनही मला खुणावत होता. त्या डोंगरापर्यंत आणि मंदिरापर्यंत जायचेच, अशी खूणगाठ मी बांधलेली होतीच. 'अगं फार दूर नाही. चल पटपट' असे म्हणत मी तिला अक्षरश: ओढत नेऊ लागलो. खरे तर चालून चालून माझेही पाय जड पडले होते. पण अंगात शिरलेला कामदेव काही पावलांना थांबू देत नव्हता. अंगात वारे भिनल्यासारखे आम्ही डोंगराच्या दिशेने पळत सुटलो होतो. आता डोंगरही जवळ आला होता. त्याच्या कुशीतले मंदिरही स्पष्ट दिसत होते. बस्स आधी मंदिराच्या पायऱ्यांवर काही क्षण बसू आणि नंतर मंदिराच्या मागच्या झाडांमागे जाऊन तृप्त होण्याची माझी योजना फलस्वरूपात येण्याची शक्यता काही मिनिटांवरच येऊन ठेपली होती.  आमचे पाय मंदिराच्या पायऱ्यांजवळच जाऊन थांबले. एक मोठा उसासा दोघांनीही घेतला. चालून चालून दमल्याने ती मंदिराच्या पहिल्या पायरीवरच मटकन बसली. तसा मीही एक जोराचा श्वास घेऊन तिला बिलगून बसलो. चालून चालून लागलेली धाप जाईपर्यंत एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून आम्ही श्रमपरिहार केला. आता मंदिराच्या मागे जायची घाई होती.
'चल आपण तिकडं मागे जाऊन बसूयात'  असे म्हणत मी शांततेचा भंग केला. तिनेही डोळे आणि मानेनेच होकार दिला. देव दर्शन बाजूला ठेवून आम्ही मंदिराच्या बाजूने खड्डे आणि दगडांच्या रस्त्याने वाट सर करू लागलो. माझ्या मनात काहूर माजलं होतं. तिच्यासोबतच्या भेटीचा सर्वोच्च आनंद देणारा क्षण माझ्या वाट्याला येणार होता. मनोमनी मी हुरळून गेलो होतो. ती धुंदीच अशी होती की, त्या डोंगराळ रस्त्यावरून चालायचेही भान मी हरवून बसलो होतो. चालता चालता माझा पाय एका गोल छोट्याशा दगडावर पडला आणि माझा तोल जाऊन मी धप्पकन चारीमुंड्या चीत व्हावा, तसा जमिनीवर आडवा झालो. त्याचक्षणी डोळे उघडले. माझ्याजवळ झोपलेल्या माझ्या लेकाराने मला झोपेत लाथ मारली होती. बाजूलाच माझी अर्धांगिनी जोरात घोरत होती. ती स्वप्नातली अप्सरा झोपेबरोबर कधीच उडून गेली होती. ना तेथे रती होती ना कामदेव.  होता फक्त स्वप्नांतला हळूवार स्पर्श!

1 टिप्पणी:

  1. हळुवार स्पर्श मी एक महिना पूर्वीच वाचले होते , त्यानंतर तुमचा प्रत्येक ब्लॉग मे वाचला आहे , खूपच अप्रतिम लिखाण , स्वप्न पाहणे सोपे पण ते लिखाणात उतरवणे फारच अवघड पण ती कला तुमच्यात आहे .

    उत्तर द्याहटवा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...