सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

मिठू मिठू


पहाटेचे तीन वाजले होते. गण्या गाढ झोपेतही अंथरुणात बुळबुळ करत होता. 'मला माफ कर.. मी चुकलो.. ' असे काही तरी बरळत होता. त्याच्या हा असंबद्ध बोलण्यामुळे पत्नी मालतीला जाग आली. ती गण्याचा असा झोपेतला अवतार पहिल्यांदाच बघत होती. त्यांच्या लग्नाला २० वर्षे झाली होती. पण हा प्रकार तिला प्रथमच अनुभवायला मिळाला. गणू महाराज स्वप्नात असावेत, याची तिला खात्री पटली. म्हणून तिने गणूला आवाज न देता चुपचाप तो झोपेत काय काय करू शकतो, हे उत्सुकतेनं बघत होती. 'संध्या मला माफ कर.. मी खरंच चुकलो गं!', असे म्हणत झोपेतच हात जोडून गण्याने एक लोळण घेतली आणि धडाम करत तो पलंगावरून फरशीवर आपटला.  गण्याची झोप पुरती उडाली होती. पण मालतीच्या डोक्यात तारे चमकू लागले होते. गण्यानं झोपेत केलेल्या संध्याच्या उल्लेखामुळे मालतीच्या डोक्यात काजवे चमकू लागले होते.
'काय गणू महाराज! काय सुरू आहे तुमचं! आज तारे जमिनीवर कसे?' मालती फरशीवर लोळत असलेल्या गणूला म्हणाली.
मालतीनं आपल्याला फरशीवर पडल्याचं बघितलेलं दिसतं याची जाणीव झाल्यानं गणू ओशाळून गेला.
'संध्यानं धक्का दिला वाटतं?' मालती कुचितपणे बोलली.
'कोण संध्या? मी नाही ओळखत!' झोपेचे सोंग घेत गण्या बोलला.
'तीच हो.. आता तुम्हाला पलंगावरून धक्का देणारी!' मालती थट्टेच्या सुरात बोलली.
'अगं मी पलंगाच्या कडेवर झोपलो होतो. कुस बदलताना तोल गेला माझा!' गणू सावरासावर करत बोलला.
'असा कितीदा गेलाय तोल तुमचा?' मालती त्याचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हती. मालतीला काय सांगावं, हेच त्याला सुचेना.
'आता मुकाट्यानं झोप.. सकाळी बोलू', म्हणत गण्या फरशीवरून उठला आणि पुन्हा पलंगावर अंगावर घेऊन झोपला. मालती त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण गण्या झोपेच्या सोंगात होता. त्याला आता उठवणं मालतीसाठी कठीण होतं.
दिवस उजाडला. किचनमधून आज भांड्याचा जरा जास्तच आवाज येत होता. मालती भांडी धुत होती की आपटत होती, हे गणूला कळत नव्हतं. रात्रीचं सोंग अजूनही सरलं नव्हतं. मालती भांडी अशी आपटत होती जणू ते गण्याचं डोकंच होतं. गणू अंगावरचं पांघरुण बाजूला सारून हळूच किचनमध्ये गेला. त्याची दोन मुलं दुसऱ्या खोलीत अजूनही झोपलेलीच होती.  संध्या रात्री आलेला राग सकाळी सकाळी भांड्यावर काढत होती, हे उघड होतं. गणू हळूच मालतीच्या मागे गेला आणि तिला अलगद मिठी मारली. पण मालतीच्या हातातल्या भांड्यानं गणूच्या हाताच्या कोपऱ्याचा अचूक वेध घेतला, तशी गणूची मिठी सैल झाली आणि तो वेदनेनं विव्हळू लागला.कोपरावर पडलेल्या भांड्याचा टण.. असा आवाज येताच गणूच्या हाताच्या मुंग्या मस्तकापर्यंत गेल्या.
'आई गं..मेलो..!' असा आवाज गणूच्या तोंडून निघाला.
'काय झालं बाबा..' गणूचा मोठा मुलगा प्रतीक यानं बाजूच्या खोलीतून आवाज दिला.
'अरे काही नाही बाळा तू झोप.. भिंतीचा कोपरा लागला!' गणूनं ओरडूनच सांगितलं.
'चहा बनवून देऊ की संध्या येणार बनवायला?' मालती  विक्रम-वेताळ्याच्या कथेतील वेताळासारखी अडून बसली होती.
'माझे आई सांगतो तुला सगळं..! पण आता नाही हं', मालतीच्या कपाळावर डोकावणारी बट बाजूला सारत गणू बोलला.
'हात नका लावू मला!' मालती खेकसली.
'कुठं लावला?' खांदे उडवत गणू बोलला.
'माझ्या केसांनाही नाही!' मालती पुन्हा खेकसली.
'बरं..'  विश्राम मुद्रेत असलेला गणू सावधान होत बोलला.
'बरं त्या संध्याचं काय?' मालतीची सुई पुन्हा संध्यावरच येऊन अडकली.
'अगं काही नाही... मी स्वप्नं बघितलं. संध्या नावाची माझी कॉलेजची मैत्रिण माझ्या स्वप्नात आली.आमची केवळ फ्रेंडशिप होती. अफेअर वगैरे काहीच नाही बरं का.' गणू सांगत होता.
'अफेअर नव्हतं तर ती स्वप्नात आलीच कशी?' मालतीनं वकिली पाॅइंट हाणला.
'अगं स्वप्नं काय मी रचलं होतं का?' गण्या चिडून बोलला.
'बघितलं तर तुम्हीच ना!' चिडक्या सुरात मालती बोलली.
'तू आधी नीट ऐकून घेणार असशील तर पुढचं बोलतो. नाही तर ती संध्याही गेली चुलीत अन् तुही जा', म्हणत गणू पाय आपटून वळला.
'बरं बरं... या इकडं.. मी नाही बोलत आता,' संध्यानं तह केला.
'अगं स्वप्नात मी तिच्यावर..',  अवंढा गिळून गणू थांबला.
'काय केलं तुम्ही..' मालती पुन्हा एकदा बोलली.
'तू थोबाड बंद ठेवलं तर मी उघडतो..!' गणू पुन्हा चिडला.
'बरं बाई.. नाही तरी तुम्ही पुरुष मंडळी बायकांना बोलूच कुठं देता!' त्रागा करत मालती बोलली.
'आता वीस वर्षांपासून तूच बोलतीना.. मी आज कुठे बोलतोय तर तोंड घालू नकोस मधेमधे', गणू वैतागून बोलला.
'बरं जाऊ द्या.. सांगाना  काय केलं तुम्ही...'
'अगं मी तिच्यावर बळजबरी केली..'
'अच्छा तर हे पुण्यकर्मही तुम्ही करता म्हणायचं!', मालती पुन्हा एकदा बरळली.
'अगं पूर्ण ऐकून तर घे...' गण्या वसकला.
'बरं बाई..' म्हणत मालती भांड्यावर हळूवार हात फिरवत बोलली.
'आम्ही पिकनिकला गौताळा अभयारण्यात गेलो होतो. संध्याला झाडावरचे पोपट दाखवत आम्ही इतरांना पुढे जाऊ दिले आणि मी तिचे तोंड दाबून अत्याचार केला. संध्या या प्रकाराविषयी कोणाला काहीच बोलली नाही. पण दुसऱ्या दिवशी ती माझ्या घरी आली. तिनं माझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. पण माझं आणि तुझं (गणू-मालती) अफेअर असल्यानं  मी लग्न करूच शकत असं सांगून स्पष्ट नकार दिला. तिसऱ्याच दिवशी तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवर 'ME TOO' पोस्ट केली.  मी अकबर, नाना, अलोकबाबू यांच्या रांगेत जाऊन बसतो की काय याची भीती वाटू लागली. बरं मी एक चाकरमान्या माणूस. माझ्या दिमतीला ९० वकीलही येऊ शकत नाहीत. की मी संध्यावर कोट्यवधी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही करू शकत नाही. तरीही मी स्वत:ला दोषी समजून संध्याला फोन करून घरी बोलावलं.  मी तिला  मालतीवरच प्रेम करतो, असं बेंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न केला. पणी ती माझ्याशी लग्न कर नाही तर तुला आत्ताच खल्लास करते, अशी धमकावत होती. मी शेवटी मेलो तरी चालेल पण तुझ्याशी लग्न करणार नाहीच, असं शेवटचं सांगून टाकलं. त्यावर तिनं पर्समधून पिस्तुल काढून माझ्यावर रोखलं.  जिवाच्या भीतीनं मी  'मला माफ कर.. मी चुकलो.. ' असं सारखं  विनवत होतो. पण तिनं एक गोळी झाडलीच. ती थेट माझ्या छाताडात घुसली. मी जमिनीवर कोसळलो. ती जमीन आपल्या घरातली फरशी होती गं.' गणूनं आपलं पूर्ण स्वप्न सांगून टाकलं.
'वाचले गं बाई...हे स्वप्नं होतं तर..', मालती  मोठा श्वास घेत बोलली.
'होय गं..' गणूही मोठा श्वास घेत बोलला.
मालतीचं आता पूर्ण समाधान झालेलं होतं. पण गणूला असं स्वप्नं पडण्याचं कारण काय? असा प्रश्न तिला भेडसावत होता. शेवटचं भांडं नळाखाली खंगाळून मालतीनं चहा मांडला. तिनं मुलांनाही चहा घेण्यासाठी आवाज दिला. सगळी मंडळी सोफ्यावर बसून चहाचा आस्वाद घेत होती. कधी पेपर न वाचणाऱ्या मालतीनं टी पॉयवर पडलेला पेपर हातात घेतला. त्यातील शीर्षकांवर ती नजर फिरवत होती. तिची नजर पेपरमध्ये छापून आलेल्या 'ME TOO' च्या तीन प्रकरणांवर नजर पडली आणि मालतीही भूतकाळात पोहोचली.  चहाचे घोट घेत ती सोफ्यावरून उठली. नकळतच गॅलरीत पोहोचली. घरामागील झाडावर बसलेला एक 'मिटू' तिला वाकुल्या दाखवत होता...

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

तीन भवान्या (विनोदी)


ब्रह्मदेव दरबारात बसले होते.  'नारायण नारायण..' एैसा आवाज त्यांच्या कानी पडला. ब्रह्मदेवाच्या चेहऱ्यावर हास्याच्या छटा उमटल्या. दरबारात एंट्री करण्यापूर्वी नारदमुनी 'नारायण नारायण' असा गजर देत. त्यामुळे या वेळी नारदमुनी काही तरी वेगळी खबर देतील, हे ब्रह्मदेवाला ठाऊक होते. थेट ब्रह्मदेवासमोर नारदमुनी प्रकटले.
'वंदन करतो ब्रह्मदेवा..'  नारदमुनींनी वाकून ब्रह्मदेवाला नमस्कार केला.
'आयुष्यमान भव मुनीवर..' ब्रह्मदेवानं नारदमुनींना आशीर्वाद दिला.
'सांगा मुनीवर, काय खबरबात आणलीय आज? या वेळी आपल्या भेटीत एवढा खंड का? ' ब्रह्मदेवांनीच बोलायला सुरुवात केली.
'क्षमा मान्यवर.. या वेळी मी पृथ्वीतलावर गेलो होतो. त्यामुळे आपल्या भेटीत खंड पडला. पृथ्वीवर सध्या अनेक घडामोडींचे वादळ उठल्यानं तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो देवा.' नारदांनी स्पष्ट केलं.
'काय म्हणताय मुनीवर कळलं नाही.' ब्रह्मदेवानं मध्येच टोकलं.
' घटना घडामोडी प्रचंड आहेत. विशेषत: भारत देशात अधिकच आहेत. हे सगळं इथं सांगत बसलो तर खूप वेळ जाईल आपला. काही गोष्टी तर मलाही कळाल्या नाहीत. भारतात काही दिवसांपूर्वीच म्हणे तेथील न्यायदेवेतनं कलम ३७७ मधून समलैंगिकतेला वगळलेय. त्यानंतर काही दिवसांतच व्याभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ४९७  अवैध ठरवलं आहे. महाराज मला तर कायद्याचं अजिबात ज्ञान नाहीय. तुम्हीच जर हे विस्तारानं जाणून घेतलं तर बरं होईल ' नारदमुंनीनी आपलं बोलणं पूर्ण केलं.
कलम ३७७, ४९७ ही भानगड ब्रह्मदेवालाही कळाली नाही. ब्रह्मदेवाची उत्सुकता प्रचंड ताणली गेली. भारतात चालले तरी काय? हे जाणून घेतलंच पाहिजे, असा निर्धार ब्रह्मदेवांनी केला.
'मुनीवर... पुन्हा पृथ्वीतलावर जाण्याची तयारी करा. मी जरा फ्रेश होऊन प्रवासाची तयारी करतो.' ब्रह्मदेवाने आदेश केला.
'होय महाराज...पण एक परंतु आहे. भारतात जायचं असेल तर मोठा धोका पत्करावा लागणार आपल्याला.' नारदमुनी चिंतीत मुद्रेत बोलले.
'काय किंतू आणि परंतु.. कसला धोका मुनीवर?', ब्रह्मदेव तडकाफडकी बोलले.
'त्याचं काय महाराज भारतात सध्या मॉब लिंचिंग नावाचा एक विचित्र प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणताही अनोळखी माणूस दिसला की भारतातले लोक अंगात सैतान शिरल्यासारखी मारहाण करतात. '
'बापरे.. हा काय प्रकार?' ब्रह्मदेवाच्या आवाजात भीतीचे कंपण होते.
'देवा हे तर काहीच नाही..  नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, रफाल घोटाळा, शबरीमाला मंदिर अशा कितीतरी भानगडी मी भारतात बघितल्या. त्यामुळे आपल्याला सामान्य माणूस म्हणून भारतात जगता येणार नाही. थोडं हायफाय गेटअप करावं लागेल. '
'ठीक आहे मुनीवर.. तुम्ही म्हणाल तसं!', असे बोलून ब्रह्मदेव सिंहासनावरून उठले. जाताना त्यांनी सेवकांना 'माझी बॅग भरारे. वाहनही तयार ठेवा', असा आदेश दिला. नारदमुनीही अदृश्य झाले.
ब्रह्मदेवाची पृथ्वीवर अर्थात भारताकडे कूच करण्याची तयारी पूर्ण झाली होती. दैनंदिन गरजांसाठी लागणारं साहित्य त्यांनी आपल्या वाहनात कोंबले होते. ब्रह्मदेवांनी मनगटावरील घड्याळीकडं बघितलं. 'हे नारदमुनी ना कधीच वेळेत येत नाही.' असे स्वत:शी पुटपुटले. तेवढ्यात 'नारायण नारायण'चा गजर त्यांच्या कानी पडला. पुन्हा ब्रह्मदेवांच्या चेहऱ्यावर हास्यछटा उमटल्या. काही क्षणातच मुनी त्यांच्यासमोर प्रकटले.
'महाराज निघण्याची तयारी झालीय ना?' मुनींनी प्रश्न केला.
'होय मुनीवर...' ब्रह्मदेवाचे उत्तर.
'सोन्याची नाणी, माणिक मोती, पवळे हे सर्व सोबत घेतले ना?' मुनींनी प्रश्न केला.
'मुनीवर याची काय गरज?' ब्रह्मदेवाचा प्रश्न.
'महाराज.. भारतात पैशांची खूप गरज आहे. तेथील सरकार कधीही नोटबंदी करू शकते. सोन्याच्या बदल्यात नोटा आपल्याला सहज मिळवता येतील.शिवाय फोर व्हिलर, अॅपल नाही तर अॅन्ड्रॉईडफोन, थ्री बीएचकेडी घर इत्यादी इत्यादी खरेदी करण्यासाठी आपल्याकडे धन असणे गरजेचे आहे.' मुनींनी बोलणे पूर्ण केले.
'सेवक... त्या कुबेरजींना मुनी सांगितील तेवढे धन द्यायला सांगा!' ब्रह्मदेवाने आदेश दिला.
'जी देवा!' सेवकाने आदबीने होकार देत नारदमुनींना सोबत चलण्याचे संकेत दिले. थोड्याच वेळात एक मोठी पोटली घेऊन सेवक आणि मुनी परतले.
ब्रह्मदेव आणि मुनींचा भारतभूमीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अनेक ग्रहताऱ्यांचा प्रवास करत त्यांची स्वारी भारतभूमीवर प्रकटली. भारतभर पसरलेल्या 'सुलभ' नावाच्या संस्थेच्या एका स्नानगृहात अंघोळ करून देव आणि मुनींनी भरजरी वस्त्रांऐवजी भारतातील उच्च भ्रू मंडळी परिधान करतात तशी वेशभूषा केली. नंतर ते वास्तव्याचे ठिकाण शोधू लागले. अनेक वस्त्या, गल्ल्या पालथ्या घातल्यानंतर देव आणि मुनींनी आटपाटनगरातच वास्तव्यास राहणे पसंद केले. तेथेच त्यांनी सेकंड सेलचा वन बीएचके फ्लॅट खरेदी केला. कारण हे आटपाटनगर म्हणजे 'कोणीही यावे अन् राहून जावे', अशी ख्याती असलेले होते. या नगरीत अगदी हुशार माणसापासून ते बुद्धीचं दिवाळं निघालेल्या व्यक्तीही राहत होत्या, याची नारदमुनींनी आधीच कल्पना दिली होती. त्यामुळं 'वासरात लंगडी गाय शहाणी' असा आपल्याला दर्जा मिळू शकतो. शिवाय थोडी पैशांची फुशारकी मारली की काही बाई माणसं गोंडा घोळत मागे येतात, याचीही नारदमुंनीनी ब्रह्मदेवाला कल्पना दिली होती.  ब्रह्मदेवानं सोबत आणलेली पोटली आधी सुरक्षित ठिकाणी ठेवली. भारतात दरोड्याचे प्रकार खूप घडतात हे त्यांना नारदांनीच सांगितलं होतं. उर्वरित सर्व सामानसुमान नीटनेटकं लावून ब्रह्मदेव आणि मुनी अंथरुणात पहुडले. पण त्यांना त्यांच्या फ्लॅटच्या खाली कोणी तरी जोरात खिदळत असल्याचा आणि मोठ्यानं बोलत असल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांचा निद्रानाश झाला. अशा शांत परिसरात रात्री अकरा वाजता कोण खिदळत असणार, याची देवांबरोबरच मुनींनाही उत्कंठा होती. त्यांनी स्लायडिंग विंडो उघडून बाहेर बघितले असता तीन महिला एकमेकींत खुसूरफुसूर करत मध्येच मोठ्याने खिदळत असल्याचे लक्षात आले. तिघींपैकी दोन महिला शरीराने प्रचंड असल्याचे आणि त्यातीलच एक आवाजानेही प्रचंड असल्याचे मुनींनी हेरले. एक महिला सर्वसाधारण अंगकाठीची होती, मात्र ती चेहऱ्यावरून प्रचंड धूर्त जाणवत होती. मंथारा, कैकयीलाही लाजवणारी तिची मुद्रा भासत होती. या नेमक्या काय बोलत असाव्यात याची मुनीवरांची उत्कंठा प्रचंड शिगेला पोहोचली होती.
'देवा...तुम्ही खिडकीतच थांबा मी आलोच' म्हणत नारदमुनी अदृश्य झाले. या तीन महिला जेथे बसल्या होत्या तेथील पिंपळाच्या झाडावर मुनीवर पोहोचले. मुनीवर सर्वसामान्य माणसाला दिसत नसले तरी ब्रह्मदेवाला मात्र दिसत होते. तेथे बसून मुनीवरांना तिघींचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. त्यांचं बोलणं ऐकून मुनीवरांना गरगरायला लागलं. तरीही ते कान टवकारून बोलणं ऐकत होते. लोकांची निद्रेची वेळ असताना या तिघींसाठी दिवस उगवला होता. त्यांचं बोलणं ऐकत असताना मुनींना कलम ३७७ ची आठवण झाली. सोमरसाच्या आधीन होत नवरे झोपी गेल्यानंतर या तिघींचा हाच दैनंदिन उपक्रम असावा, अशी पुसटशी शंका, मुनींच्या मनाला चाटून गेली. आता भोवळ येऊन पडायच्या आधी आपण देवांकडे जावे, असं ठरवून मुनी फ्लॅटमध्ये दाखल झाले. त्यांनी त्या तीन महिलांत काय खुसूरपुसूर चालली याचे वार्तांकन दिले. नंतर कानात कापसाचे बोळे घालून देव आणि मुनीवर झोपी गेले. अधूनमधून त्या प्रचंड महिलेचा खिदळण्याचा आवाज दोघांच्याही कानी घुमत होता. पण त्याची पर्वा न करता दोघेही शांत झोपले. दुसऱ्या दिवशी त्यांच्यासमोर अनेक कामं होती.
सकाळ झाली. देव आणि मुनीवरांनी योगासनं केली. सोबत आणलेले तहानलाडू-भूक लाडू खाऊन दोघांनी अदृश्य रूपात घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतात एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर वेगळे आणि माघारी वेगळे बोलण्याची पद्धत असल्याचे त्या तीन महिलांच्या बोलण्यातून मुनी आणि देवाच्या लक्षात आले होते.
दुसऱ्या दिवशी नवरे घरी नसताना आलटून-पालटून या तिघी एकमेकींच्या घरी  ये-जा करताना दिसल्यानंतर मुनीवरांना कलम ३७७ आहे तरी काय, हे जाणून घेण्याची इच्छा झाली. ३७७ हे एक चावटपणावर बंधन घालणारं कलम आहे, हे एकूण अनुभवावरून दोघांच्याही लक्षात आलं. पण सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी दोघेही एका निष्णात वकिलाच्या शोधात निघाले.
काही वेळ शोध घेतल्यानंतर  नको तिथे घाण कर वकील सापडला. या वकिलानं समाजात घाण केली असली तरी तो हुशार  होता याची नारदांना कल्पना होतीच. या वकिलाची अपॉइंटमेंट घेऊन त्याने दिलेल्या वेळेत मुनी आणि देव हजर झाले.
'वकील साहेब कलम ३७७ आम्हाला सविस्तरपणे सांगाल का?' मुनींनी पहिलाच प्रश्न केला.
'हो सांगतो... पण त्या आधी माझी फी लागेल' वकील म्हणाला.
'हे घ्या', म्हणत ब्रह्मदेवाने एक सोन्याचं नाणंच वकिलाच्या हातावर ठेवलं.
'अरे बापरे... याची किमत तर लाखात आहे. एवढी माझी फी नाहीय हो.' डोळे विस्फारत वकील म्हणाला.
'असू द्या वकील साहेब..  आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या'
'पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर त्यांना   ‘गे’ म्हटले जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा महिलांना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. काही पुरुषांना पुरुषांचेच आणि काही स्त्रियांना फक्त स्त्रियांचेच आकर्षण वाटते. त्यामुळे भारतीय समाज व्यवस्थेत हा गुन्हा मानला जात होता. त्यासाठीच कायदा करून त्यातील ३७७ कलमान्वये हा अपराध ठरवला गेला.' वकील साहेबांनी दोनच मिनिटांत हे कलम समजावून सांगितलं.
'असं व्हय...' सुस्कारा टाकत नारदमुनी म्हणाले.
'धन्यवाद वकील साहेब... एवढा किचकट विषय तुम्ही अगदी सोप्या भाषेत आणि आमचा वेळ न दवडता सांगितला.. पुन्हा एकदा धन्यवाद..' म्हणत ब्रह्मदेवाने नारदमुनींना पुढील मोहिमेवर निघण्याचा इशारा केला. नारदमुनींच्या डोळ्यांसमोर मात्र त्या तीन भटक भवान्या अर्थात दोन प्रचंड महिला आणि एक धूर्त महिलांच तरळत राहिल्या.
...........................
छायाचित्र सौजन्य : https://365psd.com

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

चारित्र्यवाण कविता भाभी


सकाळचे नऊ वाजले होते. मोहनराव अजूनही अंथरुणातच होते. आजूबाजूला कल्ला सुरू झाल्याने त्यांची झोप उडाली. त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बच्चेकंपनीचा गाेंधळ सुरू होता. कुणी जोराने ओरडत होते तर कुणी किंचाळत होते. 'पकडा पकडा' अशी ओरडही त्यांच्या कानावर पडली. त्याच वेळी 'रंग बरसे भिगे चुनरवाली, रंग बरसे' हे अमिताभच्या आवाजातील सुरेल गीतही मोहनरावांच्या कानी पडली. आज होळीचा धुळवड सण आहे, हे त्यांना लगेच कळून चुकले. तसेही मोहनरावांचा आवडीचा सण मुळी नव्हताच. पण एखादा उत्साही मित्र त्यांना रंगवल्याशिवाय सोडत नव्हता. मित्रांच्या आग्रहाखातर ईच्छा नसतानाही गालावर नकोसा रंग लावून घेणे त्यांना भाग पडायचे.  तसेही शहरी धुळवडीपेक्षा त्यांना खेड्यात साजरी होणारी धुळवडच अधिक पसंद होती. शहरी धुळवडीत वापरले जाणारे केमिकलयुक्त गडद रंग ताेंडाला लावल्यास माकड तरी बरे दिसावे, अशी म्हणण्याची वेळ. त्यामुळे मोहनराव स्वत:हून या सणापासून चार हात दूरच राहणे पसंद करायचे. खेड्यात पळसाची फुले कुटून त्यापासून बनवलेला गुलाबी रंग खेळण्याची मज्जाच काही और असायची.
मोहनरावांची कन्या झोपेतून उठताच मैत्रिणींसोबत धुळवड खेण्यासाठी गेली होती. मोहनराव अंथरुणातून उठले. डोळेचोळत घड्याळीकडे पाहिले. नऊचा टोल पडण्यास काही मिनिटीचे उरली होती.
'छकुली.. ए छकुली...' मोहनरावांनी हातपाय ताठत हाडांचा आवाज येईपर्यंत शरीर ताणून आळस देतच आवाज दिला.
'अहो ती आत्ताच बाहेर गेलीय. मैत्रिणीकडे!' केशरचा किचनमधून आवाज आला.
'आयला.. सकाळीच पळाली का ही कारटी.. आता बघ भुतासारखं तोंड घेऊन घरी येणार ती..' मोहनराव पुटपुटले.
'जाऊ द्या हो. लेकरूच ते.. खेळेल मैत्रिणीसोबत. वर्षातून एकदाच तर होळी असते ना!' हातात लसणाचा गाठा घेऊन उभ्या केशरने मोहनरावांना समजावले.
'खेळू दे.. पण आजकालचे रंग चांगले नसतात गं. स्किन इन्फेक्शनची जास्त भीती असते. ' मोहनरावांनी एक जांभळी देत म्हटले.
'तुमचं आपलं नेहमींचंच... असो चहा घेताय ना?' केशरने मध्येच प्रश्न केला.
'चहा नको.. आज दारूचा मूड आहे  माझा!' मोहनरावांना थट्टा सूचली.
'हो का... कधी चमचाभर तरी प्यालात का?' केशरने बाऊन्सर टाकला. त्यावरच मोहनराव क्लिन बोल्ड.
'पित नाही म्हणून काय झालं.. आज घ्यावीच लागेल!' मोहनराव पुन्हा थट्टेच्या मूडमध्ये आले.
'ठीक आहे.. पप्पांनाच आणून द्यायला सांगते तुम्हाला खंबा', केशरने गुगली टाकली. यावर मात्र मोहनराव पायचित झाले.
'बरं बाई... बागुलबुवाचं नाव सांगून मला घाबरवण्याचं तू सोडणार नाहीसच ', म्हणत मोहनराव बाथरुममध्ये बंदिस्त झाले.
मोहनराव बाथरुममधून बाहेर येईपर्यंत केशरने अद्रकीचा चहा तयार ठेवला. दोघेही एकाच सोप्यावर चहाचे गोड घोट चाखत बसले.
'तुम्ही आज कुठे जाणार नाहीत ना?' केशरने प्रश्न केला.
'कुठे जायचेय?' मोहनरावांनी प्रतिप्रश्न केला.
'रंग खेळायला म्हणतेय मी!' केशरने स्पष्ट केले.
'लेकरं बाहेर... आपण घरातच खेळूत ना रंग!' मोहनरावांना पुन्हा थट्टा सूचली. 
'तुमच्या जिभेला काही हाड... ' केशर लाजून म्हणाली.
'मी रंगच खेळायचो म्हटलो.तुम्हा बायकांना ना कुठल्या वेळी काहीही सूचते!' केशरच्या डिवचत मोहनराव बोलले.
' तुमचं दादा कोंडक्यासारखं बोलणं कळते म्हटलं मला', केशरने मोहनरावांचा चावटपण ओळखत उत्तर दिले.
'असो.. कुणी मित्र आलाच तर लावून घेईन एखादा टिळा. बाहेर जाण्याचा बेत नाही. ' मोहनरावांनी स्पष्ट केले.
'आज जेवायला काय करायचं?' केशर म्हणाली.
'मटण आणतो की!',  मोहनरावांनी ताबडतोब उत्तर दिले.
'आणा.. मी कामं आवरून मसाला भाजते', म्हणत केशर चहाचे रिकामे कप घेऊन किचनमध्ये दाखल झाली.
पारोशा अंगातच मोहनरावांनी कपडे चढवून घर सोडले. थोड्याच वेळात ते मटण, कोथिंबीर आणि काही भाज्या घेऊन घरी दाखल झाले. सोबत आणलेली रंगाची पुडीही त्यांनी उघडली. 'औपचारिकपणे पत्नी केशरला 'हॅप्पी होली' म्हणत लाडीवाळपणे केशरच्या गालावर रंगाचा ठिपका लावला.  केशरनेही कोरडाच हात त्यांच्या गालावर फिरवून 'हॅपी होली डिअर' म्हणत प्रेमाचा चौकार लगावला.
 मोहनरावांनी अंगावरील शर्ट-पँट काढल्यानंतर केशरने त्यांना नेहमीप्रेमाणे अंघोळीला जाण्याचा सल्ला दिला. पण  एखादा मित्र टपकलाच तर तो रंगवणार असे गृहित धरून दुपारपर्यंत तरी अंघोळीची गोळी घेण्याचे मोहनरावांनी ठरवले होते. 
'केशर तो होम थिएटरचा छोटा रिमोट दिसलाय का तुला? मोहनराव टेबलवर शोधाशोध करत म्हणाले.
'तो काय खिडकीत! एवढे मोठे डोळे असून काहीच कामाचे नाहीत!' केशरने नेहमीचा डायलॉग फेकला.
'मी काय अंधळा नाही. पण दिसला नाही एवढंच!', खजील होत मोहनराव म्हणाले.
'आत्ता काय गाणे लावून साहेबांना नाचायचं की काय?' केशर मस्करी करत म्हणाले.
'नाचायचं नाही नाचवायचं आहे... खाली सोसायटीतले लेकरं जमलेत त्यांना नाचवायचंय!' मोहनरावांनी स्पष्ट केले.
'अच्च्छा तर घरातली वस्तू सार्वजनिक करायचीय वाटतं तुम्हाला.' केशर खोचकपणे बोलली.
'अग लावतो तासभर गाणी. रंग खेळत लेकरं नाचतील काही वेळ' मोहनरावांनी समजुतीच्या सुरात सांगितलं.
'तुम्ही माझे ऐकणार थोडी आहात. न्या ते होमथटर..' केशर मटणाची कॅरिबॅग पातलेल्या ओतत म्हणाली.
पुढे काहीच न बोलता मोहनरावांनी होम थिएटर, वायर वगैरे सर्व वस्तू कवेत घेत पार्किंग गाठले. शेजारच्या खोलीतून करंट घेऊन होम थिएटरवर गाणी वाजवायला सुरुवात केली. बच्चे कंपनी रंगात रंगत गाण्याच्या तालावर नाचू लागली.  थोडा वेळ मुलांचा डान्स बघून मोहनराव घरात परतले. तोपर्यंत केशरने मटण शिजायला घातले होते.
'मी काही मदत करू का तुला?', मोहनरावांनी केशरला विचारले.
'जास्त काम तर नाही.. पण मिक्सरवर मसाला वाटून दिला तर सोपं होईल.' केशर अज्ञेच्या स्वरात बोलली.
'भाजणं झाला ना मसाला.. दे तर..' म्हणत स्वत:च मोहनराव किचन ओट्याकडे गेले. थाळीत भाजून ठेवलेला मसाला मिक्सर पॉटमध्ये ओतला आणि मसाल्यात पाणी ओतून तो मिक्सरवर गरगरा फिरवला. नुसत्या मसाल्याच्याच वासाने मोहनरावांना जास्त भूक लागल्यासारखे झाले.
'भाजीला किती वेळ लागेल?' मोहनरावांनी प्रश्न केला.
'मटण शिजायलाच अजून पंधरा मिनिटे लागतील. तोपर्यंत मी पोळ्या करून घेते', म्हणत मळून ठेवलेला कणकीचा उंडा केशरने किचन ओट्यावर ठेवला.
'बरं मी खाली एक चक्कर मारून येतो. कारटे होम थिएटरमध्ये पाणी सोडायचे', असे सांगून मोहनराव घराबाहेर पडले. मोहनराव एकाच मिनिटात खाली गेले. पार्किंगमध्ये मुलांची धमाल सुरू होती. रंग खेळत नाचणाऱ्या एका मुलाची आई अर्थात कविता भाभीही उत्सुकतेने मुलांचे नृत्य बघत उभी होती.
ही कविता भाभी म्हणजे एक अजबच नमुना.. अंगकाठीनं शिडशिडीत. मात्र दिसायला सर्वसामान्यच. पण तिची स्पर्धा ऐश्वर्या रायशी होती. आपण दिसायला ऐश्वर्यापेक्षाही सुंदर आहोत, असा तिचा समज. तिचा नवरा अभिषेक नसला तरी तो सज्जन पुरुष. मात्र रात्र झाली की त्यालाही कविता भाभी ऐश्वर्याच काय तर एखाद्या अप्सरेपेक्षाही सुंदर वाटायची. त्याचे कारणही तसेच. ड्युटीवरून घरी येतानाच कविता भाभीच्या नवऱ्याचा एखाद्या बार अॅण्ड रेस्टॉरेंटमध्ये तासाभराचा थांबा असायचा.  बारमध्ये येथेच्छ ढोसल्यानंतर झिंग येताच तो घराकडे निघणार. घरी पोहोचल्यावर कविता भाभी त्याला ऐश्वर्याच वाटायची.
त्या दिवशी मोहनरावांना कुठून दुर्बुद्धी सुचली देव जाणे. बच्चेकंपनी 'रंग बरसे भिगे चुनर वाली' गाण्यावर बच्चेकंपनी नाचत असताना मोहनरावही थोडे रंगात आले. पाठमोऱ्या उभ्या कविता भाभीच्या समोर जाऊन अचानक त्यांनी 'हॅपी होली' म्हणत दुरूनच कविता भाभीला रंग लावण्याची अॅक्टिंग केली. वास्तविक मोहनरावांच्या हाताला ना रंग होता ना त्यांनी कविता भाभीला स्पर्श केला. चौकीदाराची बकुळाही बाजूलाच उभी होती. पण  दुरूनच हॅपी होली म्हणणे मोहनरावांना बाराच्या नव्हे तर तेरा-चौदाच्या भावात पडले. त्या क्षणी कविता भाभीनेही हसून मोहनरावांना प्रतिसाद दला. पण  हॅपी होलीचा तो क्षण चार तासांनंतर सॅड होलीमध्ये रूपांतिरत होणार हे मोहनरावांनाच काय तर ब्रह्मदेवालाही कळणारे नव्हते. कविता भाभीने मुलांची मौजमजा पाहत अर्धा तास घालवला. तासाभरानंतर ती घरीही गेली. शेजारच्या घरी होळीच्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला तिने  हजेरी  लावली. तेथे मिळालेली खीर मोहनरावांसमक्ष वरपली.शेजारपाजारच्या महिलांसोबत ती बराच वेळ खिदळत होती. जणू काही ती गोकुळात होती.
मुलांची धुळवड खेळणे संपले होते. मोहनरावांना होम थिएटर घरी घेऊन जायची आठवण झाली. त्यासाठी ते खाली गेले. पण तेथील नजारा वेगळाच होता. कविता भाभीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पदराने डोळे पुसताना तोंडावर लावलेला पावडरचा लेपही मिटत होता. मोहनराव दिसताच कविता भाभी त्यांच्याकडे डिवऱ्या म्हशीसारखी बघू लागली. चौकीदाराची बायको बकुळाही धावतच त्यांच्याकडे गेली.
'साहेब आता तुम्हीच भाभीला समजवा. तुमच्यामुळंच त्या रडू  लागल्यात बघा.'
बकुळाचे बोल मोहनरावांचे कान चिरतच मेंदूपर्यंत पोहोचले होते.
'काय.. काय म्हणतीस बकुळा', मोहनरावांचा कानावर विश्वास बसला नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले.
'हो साहेब... तुम्ही मजाक केलेली भाभीला आवडली नाही. त्या अर्ध्या घंट्यापासून रडायल्यात बघा' बकुळानं पुन्हा मोहनरावांच्या कानात गरम तेल ओतलं.
काही क्षण तर मोहनरावांना बकुळा काय बोलतेय हे लक्षात येईना. कविता भाभीची आपण काय मजाक केली, हेही त्यांना आठवेना. कविता भाभीसोबत दोनच मिनिटे बोलल्याचे त्यांना आठवत होते. पण बकुळा तर 'मजाक' केल्याचे सांगत होती. या दोघी आपलीच तर 'मजाक' करीत नाही ना, असाही प्रश्न त्यांना पडला. पण कविता भाभीच्या एका डोळ्यातून गंगा तर दुसऱ्या डोळ्यातून जमुना वाहत होती. हे पाहून मोहनरावांना कोरड्या विहिरीत पडल्याचा भास झाला. तरीही कविता भाभी का रडतेय, हे जाणून घेण्याची मोहनरावांना उत्सुकता होती. ते भाभीजवळ गेले.
'काय झालं ताई?' मोहनराव भाबडेपणाने म्हणाले.
'भाऊ तुम्ही मजाक केली ते मला आवडली नाही' कविता भाभी अश्रू ढाळतच बोलली.
'मी काय मजाक केली बुवा', मेंदूला ताण देत मोहनराव म्हणाले.
'तुम्ही सकाळी मला हॅप्पी होली म्हणत मजाक केली ते...' जोराचा हुंदका देत कविता भाभीने आठवण करून दिली.
'हो.. म्हणालो होतो हॅप्पी होली.. मग काय बिघडलं', मोहनराव सहज बोलून गेले.
'मजाक करायच्या आधी तुम्ही मला एकदा विचारयचं तर ना..' गंगा-जमुनांचा पाट पदराने अडवत कविता भाभी बोलली.
'हॅप्पी होली म्हणणं मजाक वाटतेय तुम्हाला?', मोहनरावांनी प्रश्न करत खातरजमा केली.
'हो.. मजाकच.. मला नाही आवडली ती मजाक', भाभी रडक्या सुरातच बोलली.
मजाक शब्द वापरून कविता भाभी आपली क्रूरपणे थट्टा करत असल्याचा भास मोहनरावांना झाला. 'हॅप्पी होळी' म्हणणे कोणत्या अँगलने मजाक ठरू शकते, हे मोहनरावांच्या मेंदूलाच काय तर मनालाही पटेना. तरीही कविता भाभीसाठी हे दोन शब्द शिवी वाटत असावेत, अशी स्वत:ची समजूत करून त्यांनी भाभीची माफी मागायची ठरवले.
'हे बघा ताई.. तुमचं मन दुखावण्याचा किंवा तुमची मजाक करण्याचा माझा इरदा नव्हता. तरीही तुम्हाला इतकं वाईट वाटत असेल तर मला माफ करा', मोहनराव सडेतोडपणे बोलले.
'नाही तरी तुम्ही मजाक करायच्या आधी मला विचाराचं होतं!' कविता भाभीची सुई अजूनही तिथेच अडकून पडलेली होती.
'मी माफी मागतोय ना तुमची!' मोहनराव थोडे चिडूनच बोलले.
'मला नाही मजाक केलेली आवडत.. !' कविता भाभी एकाच सुरात गात होती.
'आता लोकं गोळा करून तुमची माफी मागू का? मी तुम्हाला एकट्यातही बोललो नाही. काय गं बकुळा.. मी काय वाईट वागलो ' मोहनराव भडकून बोलले.
'नाही साहेब.. तुम्ही काही वाईट बोलले नाही.. पण यांना तुमची मजाक आवडली नाही', बकुळानेही मोहनरावांची एकप्रकारे मजाकच केली.
'बरं ताई अजून एकदा माफी मागतो. तुम्हाला तुमचे मिस्टर काही बोलले असतील तर त्यांचीही माफी मागतो. त्यांना समजावून सांगतो', चिडलेले मोहनराव तेवढ्याच नम्रपणे बोलले.
'नाही पण.. तुमची मजाक..'
'नाही आवडली तर नाही आवडली. मी काही तुमच्या अंगाला हात लावला नाही की काही वाईट बोललो. तरीही एकदा नाही तिनदा माफी मागतो. त्यावरही तुम्हाला काय समजायचे ते समजा. मला अशा फालतू बाबींकडे लक्ष द्यायला आवडत नाही',  सविता भाभीचे बोलणे मध्येच तोडून मोहनराव बोलले.
आता तर गंगा-जमुनेला पूरच आला होता. या पुरात कोण वाहून जाणार होते, हे कोणालाही ठाऊक नव्हते. बकुळा चोमडेपणा करत कविता भाभीचे डोळे पुसत होती. मोहनरावांना आता तेथे थांबणे धोक्याचे वाटले. त्यांना बाई आणि बाटलीपासून काय धोका मिळू शकतो, याचा अंदाज होता. वेड्याच्या नादी लागलो तर दगड अंगावर येऊ शकतो, याची कल्पना आल्याने मोहनरावांनीही एकदा डिवऱ्या बैलासारखे चारित्र्यवाण भाभीकडे  बघत ते ठिकाण सोडले. घरी जाऊन मटणावर ताव मारत केशरसोबत मजाक करू लागले.

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

रंभेवर अत्याचार (उपहासात्मक कथा)

अस्वीकरण (disclaimer) : या उपहासात्मक कथेतील पात्र, प्रसंग काल्पनिक आहेत. याद्वारे कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. कुणाला कथेतील एखाद्या पात्राचा स्वत:शी काही संबंध वाटला तरीही तो योगायोगच समजावा.)..................................................... 
इंद्रदेवाला स्वर्गलोकाचा कंटाळा आला होता. म्हणून तो पृथ्वीतलावर आला. साक्षात इंद्रदेवच पृथ्वीच्या दिशेने निघाले म्हणून रंभा, उर्वशी, मेनकेलाही  इंद्रासोबत पृथ्वीवर जाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी इंद्राकडे आम्हालाही पृथ्वीतलावर न्यावे, असा विनंती अर्ज केला. पण इंद्राने यासाठी  टर्म्स आणि कंडिशन ठेवल्या.   पृथ्वीतलावर असेपर्यंत तुम्हाला मानव म्हणून वावरावे लागेल. पृथ्वीतलावर पोहोचल्यावर तुम्हाला एका सामान्य व्यक्तीशी लग्न करावे लागेल. कारण तेथे एकट्या स्त्रीला बरेच लोक वेगळ्या नजरेने बघतात. बलात्कार, किडनॅपिंग, विनयभंग अशा अनेक घटना घडतात. त्यामुळे सर्वांनी पुरुषाला भाऊ म्हणूनच संबोधावे. शिवाय त्या पुरुषालाही आपल्याला ताईच म्हणावे, असा आग्रह धरावा.  पृथ्वीवर पोहोचताच एक फ्लॅट विकत घ्यावा लागेल. तेथे तुमच्या पतीराजांना बोलण्याची मुभा नसेल. जो काही कारभार करायचा तो मी (म्हणजे स्वत: इंद्र) आणि तुम्हीच (म्हणजे रंभा, उर्वशी आणि मेनका)  करावयाचा आहे. आपापल्या पतीदेवांना सोमरसाच्या आधीन राहण्यास सांगितले तर अधिक चांगले. पृथ्वीतलावर  मी (म्हणजे इंद्र) आणि आपापले पतीदेव वगळता  इतर पुरुषांशी जास्त बोलायचे नाही, आपली ओळख लपवूनच पृथ्वीतलावर राहायचे. कोणत्याही प्रकारची तक्रार आली तर आधी माझ्याशीच डिस्कस करायची इत्यादी इत्यादी. या तिघींनी इंद्राच्या सर्व अटी क्षणार्धात मान्य करताच  इंद्रानेही विनंती अर्जावर 'ओके'चा शेरा मारला. इंद्रदेव आणि त्याचा लवाजमा भल्या मोठ्या  वाहनाने पृथ्वीतलावर दाखल झाला. पण पृथ्वीवर पोहोचताच इंद्र चक्रावून गेला. त्या नगरातील रस्ते अत्यंत छोटे होते. त्यामुळे स्वर्गलोकातून आणलेले वाहन त्या रस्त्यावरून चालणे कठीण होते. त्यामुळे त्याने ते वाहन रेल्वेस्टेशन शेजारी  पार्क केले. तेथे पावती पुस्तक हाती धरलेल्या एका काळ्याभोर  आणि धिप्पाड पोराने त्याला  १०० रुपयांची पावती दिली.
 'भाऊ हे १०० रुपये कशासाठी द्यायचे?'  इंद्राने विचारले.
'नवा आलास कारे? याला पार्किंग फी म्हणतात?'
'अरे पण ही तर जागा भारत सरकारची ना? तुला पैसे का द्यायचे?' इंद्राने प्रश्न केला.
'अे मुकुटवाल्या.. जास्त शहाणपणा करू नगंस.. नाही तर ठेवून देईन एक..' काळा पोरगा चिडला.
उगीचच अप्सरांसमोर अपमान नको म्हणून इंद्राने दोन हजार रुपयांची नोट काढून त्या काळ्या पोराच्या हाती दिली.
' ए मुकुटवाला... छुट्टा देने का? इथं श्रीमंती दाखवायची नाय..' काळा पोरगा पुन्हा भडकला.
इंद्रदेवाकडे सुटे पैसे नव्हते. त्यामुळे रंभाने पुढाकार घेत गुढ्याला खोवलेली शंभराची नोट काढून त्या काळ्या पोराच्या हाती दिली. बाडबिस्तरा उचलून इंद्राचा लवाजमा पुढे निघाला. इंद्रदेव स्टेशन परिसरावर नजर फिरवू  लागला. तेथे फुटपाथवर अनेक जण झोपलेले होते. इंद्राने चौकशी केली असता या लोकांकडे घरे नसल्याने ते दररोज येथेच झोपतात, असे सांगितले. त्यामुळे आपल्याला घर लवकर मिळेल की नाही, असा प्रश्न इंद्राला पडला. पण पृथ्वीवर खिशात पैसे असले की सर्व काही मिळते, हे इंद्राला नारदमुनीने सांगितले होते. त्यामुळे इंद्र निर्धास्त होता. रेल्वेस्टेशनच्या बाहेर पडताच इंद्राचा पाय पाणी तुंबलेल्या खड्ड्यात पडला. तसे घाणेरड्या पाण्याचे शिंतोडे त्याच्या वस्त्रांवर उडले. रस्त्यावरील खड्डे ही महापालिकेची देण असल्याचे लवकरच त्याच्या लक्षात आले. उगीच खाचखळग्यांच्या रस्त्यांवर हिंडण्यात अर्थ नाही. आपण जवळच घर बघू असे ठरवत इंद्र आणि त्याचा ताफा स्टेशनला लागूनच असलेल्या आटपाटनगरातील एका चार-पाच मजली इमारतीत पोहोचला. तेथे बरीच घरे विक्रीची असल्याचे त्याला एका रहिवाशाने सांगितले. इंद्राने तेथील मालकमंडळीशी बोलून चार घरे विकत घेतली. एक घर रंभा, दुसरे उर्वशीला आणि तिसरे मेनकेला दिले. चौथ्या घरात खुद्द इंद्र राहायला गेला.
इंद्राच्या ताफ्यातील या ललनांकडे पाहून अनेक जण लाळ गाळू लागले. तेव्हा इंद्राने घालून दिलेली अट त्यांच्या लक्षात आली. रंभा, उर्वशी आणि मेनकाने आपापले वर निवडून त्यांच्याशी संसार थाटला. इंद्रदेव आधीच अनेक बायकांचा दादला होता. तरीही त्याला येथेही लग्न करण्याचा मोह आवरला नाही. तसेही स्वर्गलोकात आणि पृथ्वीतलावर पुरुषांनी कितीही  लग्ने केली तरी चालतात, हेही नारदाने सांगितलेच होते. यासाठी त्याने अनुप जलोटा, शशी थरूर, आसाराम बापू, रामरहीम अशी काही नावेही सांगितली होती. त्यामुळे इंद्रानेही एक सामान्य महिलेशी विवाह केला.
काही दिवस लोटले. इंद्राने संपूर्ण शहराची माहिती करून घेण्यासाठी एक छोटे वाहन खरेदी केले. पण खड्डेमय शहरात फिरताना या वाहनातील पेट्रोल लवकर संपू लागले. अन्नधान्याची महागाई, जेथे जाईल तेथे पैसे लागत होते. त्यामुळे स्वर्गातून आणलेला खजिना संपू नये, याची त्याला चिंता होती. हा खजिना तसाच ठेवण्यासाठी  आणि पार्ट टाईम उत्पन्न मिळवण्यासाठी काय करावे, असा यक्षप्रश्न त्याला पडला. राजकारणात खूप पैसा मिळतो, हे नारदाने सांगितले होते. कोळसा घोटाळा, टेलिकॉम घोटाळा, चारा घोटाळा, बोफोर्स घोटाळा, राफेल घोटाळा असे कितीतरी घोटाळे पैसे मिळवण्याचे राजकारण्यांचे साधन ठरू शकतात, हेही नारदाने सांगितले होते. म्हणून राजकारणच इंद्राची फर्स्ट चॉईस ठरली. राजकारण प्रवेशासाठी त्याने धर्माच्या नावावर चालणाऱ्या एका पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. शेवटी तो इंद्रच... मानवापेक्षा त्याची बुद्धी श्रेष्ठच होती. काही दिवसांतच त्याने राजकारणावर मोठी पकड निर्माण केली. साम, दाम, दंड, भेद या सगळ्या नीतींसोबत 'डिव्हाइड अॅण्ड रुल्ड' म्हणजेच 'फोडा आणि राज्य करा' या अस्त्रांचा वापर केला तर राजकारणात आडवे येणाऱ्यांना आडवे करता येते, असे नारदमुंनीनी सांगितल्याचे इंद्राला आठवले. यासाठी इंद्राने इंग्रजांचे उदाहरण दिले होते. ही अस्त्रे वापरून इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर कसे राज्य केले होते, हेही नारदमुनींनी इंद्राला पटवून दिले होते. या अस्त्रांच्या भरवशावर  आपण पृथ्वीतलावर राज्य करू शकतो, याची इंद्राला पक्की खात्री पटली होती. हळूहळू इंद्राची प्रगतीकडे वाटचाल सुरू होती. राजकारणावरही त्याने पकड निर्माण केली. देशातीलच काय तर तो राहत असलेल्या आटपाटनगरातील प्रत्येक समस्या निवारण्यासाठी लोक त्याच्याकडेच येऊ लागले. स्वर्गातील देव आता पृथ्वीवरील लोकांचाही देव बनला होता.  समस्या कुठल्याही प्रकारची असली तरी ती 'मीच सोडवणार', इतका इंद्राचा कॉन्फिडन्स वाढला होता. पण एका गोष्टीची त्याला सारखी उणीव भासत होती. ती म्हणजे  पृथ्वीतलावर त्यांच्यासोबत नारदमुनी आले नव्हते. पण त्यांची ही उणीव आटपाटनगरातीलच एका नारदीनं थोडी का होईना भरून काढली होती. नारदमुनी स्वर्ग, नरक, समुद्र, पाताळ, पृथ्वी अशा सर्वच ठिकाणची माहिती ठेवत होते. नारदमुनीएवढा या नारदीचा आवाका नसला तरी तिला  तरी आटपाटनगरातील सर्व खबरी असायच्या. नारदमुनी देवदेवदांत भांडणे लावण्यात कुशल होते, तर या नारदीला माणसामाणसात भांडणे लावण्याची कला अवगत होती. रंभेची उर्वशीकडे तर उवर्शीची रंभेकडे चुगली करण्यातही ही नारदी पटाईत. पण तिला इंद्रदेवाने देवीचा दर्जा दिल्याने या सगळ्या अप्सरा तिलाही मानाचेच स्थान देऊ लागल्या.  इंद्रदेवाने तर या नारदीला आपल्या खास लोकांत स्थान दिलेले होतेच. .
  इंद्रासमोर अनेक जण वेगवेगळ्या समस्या घेऊन येत. एकदा तर   खुद्द रंभाच समस्या घेऊन आली.
'महाराज.. महाराज... घोर अनर्थ झाला. मला न्याय द्या.. न्या द्या' रंभा ओरडतच आली.
घाबरलेल्या, बावरलेल्या रंभेला पाहून इंद्र काळजीत पडला. रंभेचा कोणी बलात्कार, विनयभंग तर केला नाही ना, अशी संशयाची पाल त्याच्या मनात चुकचुकून गेली.
'शांत हो रंभा.. काय विपरित घडलं ते शांतपणे सांग बघू', इंद्राने रंभाला शांत करत शांत स्वरात विचारले.
'कशी सांगू महाराज.. सांगायलाही जीभ वळेना. माझ्यावर अन्याय झालाय' असे म्हणत रंभा हंबारडा फोडून रडू लागली. रंभावर खरच अत्याचार झाला असणार, याची इंद्राला खात्री वाटू लागली. इंद्राने नारदीला आवाजा दिला.
'नारदे जो कोणी गुन्हेगार आहे त्याला आत्ताच्या आता हजर कर !' इंद्रदेव करड्या स्वरात बोलला.
'होय महाराज'  म्हणत नारदी तेथेून निघाली. चार पावले पुढे गेल्यावर पण हजर करायचे तरी कोणाला, हा प्रश्न नारदीला पडला. कारण इंद्रदेवावर अंधविश्वास ठेवणारी नारदी स्वत:च्या डोक्याने कधीच विचार करत नव्हती. पहिल्यांदाच तिला स्वत:चे डोके वापरावे लागले होते. ती माघारी फिरली.
'महाराज.. पण कोणाला हजर करायला सांगायचे?' तिचा इंद्राला प्रश्न होता.
'अरेच्चा ही तर गडबडच झाली. आरोपी कोण हे जाणून घेण्याआधीच मी त्याला हजर करण्याचा हुकूम कसा काय सोडला?  इंद्र स्वत:च्या डोक्यावरील पांढरे केस खाजवत स्वत:शी पुटपुटला.
'अगं रंभे काय घडलं ते आधी सांग बघू!' इंद्राने रंभेला प्रश्न केला.
'महाराज... तो मोहनभाऊ माझ्याशी बोलला.' आवंढा गिळत रंभेने सांगितले.
'तर मग.. काय केले त्याने तुला?' इंद्राचा पुढचा प्रश्न होता.
'नाही महाराज.. काहीच केले नाही त्याने!' रंभेने प्रश्नाचे उत्तर दिले.
'मग तुझ्यावर असा घोर अन्याय झाला तरी काय?' इंद्राने खोदून विचारले.
'त्याचं काय महाराज... माझ्या नवऱ्याला मी कोणाशी बोललेले आवडत नाही. मोहनभाऊशी बोलताना माझ्या नवऱ्याने बघितले तर गजहब होऊ शकतो.' रंभाने अकलेचे तारे तोडले.
 एखादा पुरुष स्त्रीसोबत बोलला तर काय गजहब होऊ शकतो. तसेही मोहन उच्च शिक्षित व्यक्ती आहे. तो मोहन आहे..मदनदेव थोडीच आहे. तो बोलला तर रंभेला एवढे आक्षेपार्ह वाटण्याचे कारण काय, असा प्रश्न इंद्रालाही पडला. पण मोहनपेक्षा रंभाच इंद्राला जवळची होती. रंभेला दुखवून कसे चालणार? तसेही मोहन आपल्या  राजकारणात कधीमधी आडवा येतो, याचा इंद्राला थोडाबहुत राग होताच. 'फोडा आण राज्य करा' हे अस्त्र आता अचूकपणे वापरता येऊ शकते, याची इंद्राला कल्पना आली.
'हो का? तो मोहन तुझ्याशी बोललाच कसा? त्याची एवढी हिंमत?' इंद्र खवळला.
'मलाच नाही महाराज.. तो उर्वशी आणि मेनकेलाही बोलतो. ' रंभाने होते नव्हते तेवढे अकलेचे तारे तोडले.
'नारदे.. आता जा बघू... त्या मोहनसगट उर्वशी आणि मेनकेलाही बोलावून आण.' इंद्राने हुकूम सोडला.
नारदीनं आपले काम चोखपणे बजावले. इंद्राचा न्यायनिवाड्यासाठी दरबार भरला. मोहन आरोपीच्या पिंजऱ्यात होता.
'मोहन.. खरं सांग.. तू रंभेला काय बोलला?' इंद्राने सभेचे कामकाज सुरू केले.
'काही नाही महाराज.. रंभाताईशी मी शहराच्या राजकारणावर बोलत होतो. शहरातील रस्त्यांवर किती खड्डे पडलेत. चार दिवसांआड शहराला पाणी मिळत आहे. कचऱ्याचे ढीग गल्लोगल्ली जमलेत. सत्ताधारी नगरसेवक काहीच करत नाहीत. त्यांना पदावरून हटवून महिलांनीच आता पुढाकार घेऊन पालिकेची सत्ता हाती घ्यायला हवी, असे विचार मांडत होतो.' मोहनने स्पष्टीकरण दिले.
'काय रंभे.. असेच बोलला का हा मोहन?' इंद्राने प्रश्न केला.
'होय महाराज...' रंभा उत्तरली.
सभेचे कामकाज सुरू होते. रंभेच्या आरोपामुळे मोहन व्यथित झाला होता. पण इंद्रदेवापुढे त्याचे काहीच चालेना. इंद्रदेवही रंभा, उर्वशी आणि मेनकेला प्रोटेक्ट करण्यासाठी मोहनला अकलेचे धडे देऊ लागला.
'अरे मोहन.. असे महिलांशी बोलू नये. अशाने त्यांचा संसार मोडेल ना!' इंद्र म्हणाला.
'कसा महाराज?' मोहनने प्रतिप्रश्न केला.
'हेच.. की तू या महिलांशी बोलताे म्हणून.' इंद्राने तोच मुद्दा पुन्हा रेटला.
'हो महाराज.. एखादा पुरुष परस्त्रीशी बोलला म्हणून आजवर किती संसार मोडले?' मोहनने पुन्हा प्रतिप्रश्न केला.
'ते मला माहीत नाही.. पण मोडेल ना रे!' इंद्र तेच तेच तुणतुणे वाजवत होता.
बराच वेळ सभेत आरोप प्रत्यारोप, दावे, प्रतिदावे झाले तरी निवाडा होतच नव्हता. मोहनकडून वैचारिक लढाई हारलो तर या भूतलावर आपल्याला कुत्रेही विचारणार नाही, याचा इंद्राला बहुदा साक्षात्कार झाला असावा. म्हणून तो या तीन देव्यांच्या बाजूनेच राहिला.
सभा सुरू असतानाच तिल्लोत्तमेचा पतिदेव प्रकटला. त्याने सभेत काय चालले याचा अंदाज घेतला. मोहनला आरोपी ठरवले जातेय, हे त्याला कळाले. दरबारात आपणही आपली अक्कल पाजळून आपली बुद्धिमत्ता सिद्ध करू शकतो, याचा त्याला साक्षात्कार झाला. इंद्राबरोबरच तोही मोहनला ज्ञानाचे डोज देऊ लागला. एवढावेळ शांतपणे रंभा, मेनका आणि उर्वशीच्या आरोपांचा सामना करणारा मोहन चीडला. त्यात तिल्लोतमेच्या पतीनेही तोंड घातले होते.  शेवटी मोहन मनुष्यप्राणीच.. तो काही ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा बुद्धही नव्हता. राग हा मनुष्याचा प्राकृतिक स्वभाव. तो रागाने लाल झाला.
'महाराज.. मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्या?' मोहन उद्गरला.
'बोल मोहन... काय प्रश्न आहे तुझा?'
'मी जर काही वाईट बोललो असेल तर मला याच क्षणी फासावर लटकवा. नाही तर तुम्ही फाशी घ्या?' मोहनची पुरती सटकली होती.
'काय बोलतो हा माणूस? अरे तुझ्या जीभेला हाड आहे की नाही? हे बघ मी तुला शंभर कोडे मारण्याची शिक्षा देईल!' इंद्रदेव खवळून बोलला.
'अंगाला हात तर लावून बघ..' मोहन अचानक संतापला.
इंद्र आणि मोहनमध्ये खंडाजंगी सुरू झाली. तेवढ्यात तिल्लोतमेच्या पतीने या खडाजंगीत पुन्हा नाक खुपसले.
'इंद्रदेव, मेनका, रंभा, उर्वशी खऱ्या बोलत आहेत. तू असे महिलांशी बोलायला नको. तू तिल्लोतमेसोबतही बोलताना  मी बघितले. '  तिल्लोतमेच्या पतीने दुसऱ्यांदा अकलेचे तारे तोडले.
' हो का? काय बोललो ते आधी विचार!' मोहनने तिल्लोतमेच्या पतीला प्रश्न केला.
'सांग गं काय बोलला हा?'  तिल्लोतमेच्या पतीने तिला प्रश्न केला.
'नाही बुवा.. मोहनभाऊ तर काहीच बोलले नाही. ते तर मला भावासारखे आहेत?'
तिल्लोतमेचं उत्तर एेकून इंद्र आणि तिच्या नवऱ्याचे सर्व दात घशातच अडकले. तरीही उसणे अवसान आणत तिचा पती माघार घ्यायला तयार नव्हता. मुद्दयाची वाट सोडून त्याचे विमान भलतीकडेच भरकटले. ते जागेवर आणण्यासाठी मोहनची एक जोराचा ठोसा त्याच्या कानशिलावर पडला आणि भरदिवसा त्याला तारे दिसले. गडबडीने इंद्राला दरबार बरखास्त करून सर्वांना आपापल्या घरी जाण्यास सांगावे लागले. इंद्रदेवाचे त्याच्या फॉलोअर मंडळीने ऐकलेही. मोहनच्या एकाच फटक्यात दरबार बरखास्त झाला...

 तर मंडळी... इंद्रदेव बुद्धिप्रामाण्यवादाने या खटल्याचा निवाडा देऊ शकत नव्हता. पण आटपाटनगरावर त्याचा जीव जडला होता. त्याला ही पृथ्वी सोडून स्वर्गात जायची इच्छाच राहिली नव्हती. आटपाटनगरातील राजकारण, रंभा, उर्वशी, मेनकाबरोबरच बऱ्याच महिलांनी त्याला देवत्व प्रदान केले होते. स्वर्गापेक्षाही इंद्राचे येथे जास्त फॉलोअर निर्माण झाले होते. रंभा, उर्वशी, मेनका, अप्सरा यांचे पतिदेव निमित्तमात्र आहेत. इंद्रदेव आणि नारदी यांचेच आटपाटनगरातील लोकांवर अधिराज्य.  खोट्या प्रतिष्ठेतच त्याला मोठेपणा वाटू लागला. इंद्र अजून पृथ्वीवरच आहे. पुढचा कोणता आणि कसा खटला त्याच्या दरबारात येईल, हे सध्या तरी खुद्द इंद्रालाही माहीत नाही.

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...